विनायक ढेरे
नाशिक : भारतातल्या इतर राज्यांची लोकसंख्या काही कोटींच्या घरात आहे. तिथून ऑलिम्पियन येत नाहीत, असे नाही. पण एका तीस लाख लोकसंख्येच्या छोट्या राज्यातून 5 ऑलिम्पियन आज टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळत आहेत. त्यातल्या दोघांनी तर भारताला पदक मिळवून दिले आहे. हे छोटे तीस लाख लोकसंख्येचे राज्य आहे पूर्वेकडचे मणिपूर…!! Olympians are from small Manipur… Where Maharashtra stands in Olympic…??
देशातल्या इतर राज्यांमध्ये ऑलिंपियन तयार होतात पण एवढ्या छोट्या राज्यातून 5 ऑलिम्पियन तयार होणे ही दुर्मिळ घटना भारतात घडली आहे. इतर राज्यांमध्ये खेळांचे सर्वाधिकार राजकारण्यांच्या हातात. मोठमोठी “क्रीडा महर्षी” ही पदे आणि पदव्या मोठ्या राजकारण्यांना. पण ऑलिंपियन मात्र छोट्या राज्यात अशी ही वस्तूस्थिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर मेरी कोम, हॉकीपटू नीलकांत शर्मा हे तीन ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू मणिपूरचे आहेत. याखेरीज सुशीलादेवी महिला हॉकी टीमची सदस्य आहे. सुशिलादेवी लिक्माबाम ही जुदोपटू आहे हे सगळे मणिपूरी खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
कुस्तीला महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. कोल्हापूरच्या लाल मातीत खेळलेले खाशाबा जाधव पहिले भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते पहिलवान आहेत. पण आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्रात राहूनही पंजाब, हरियानातले पैलवान देशासाठी ऑलिंपिकमध्ये पदके मिळवून आणत आहेत. ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद महाराष्ट्रात शरद पवार, सुरेश कलमाडी यांनी अनेक वर्षे भूषविले आहे. परंतु महाराष्ट्रातून मोठे ऑलिंपियन ते तयार करू शकलेले नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले खेळाडू पोहोचू शकलेले आहेत. पण ऑलिंपिकमध्ये चमक दाखविणारे खेळाडू हे दोन्ही नेते तयार करू शकलेले नाहीत. मुंबईने भारताला महान क्रिकेटपटू दिले हा देखील आता इतिहास झाला आहे. मुंबईत क्रिकेटपटू उत्तम निपजत नाहीत, असे नाही. परंतु त्यापेक्षाही सरस क्रिकेटपटू आता महाराष्ट्राबाहेर निपजतात. ते भारताचे प्रतिनिधित्व करतात कर्णधार होतात. धोनी, विराट कोहली, रोहित शर्माच्या रुपाने ही उदाहरणे आज मैदानावर दिसतात.
भारताचे हॉकीपटू दक्षिणेतून, पूर्वेकडील राज्यातून येतात. उत्तर प्रदेशातून येतात. पैलवान पंजाबातून हरियानातून आणि पूर्वोत्तर राज्यातून येतात. मणिपूर सारखा तीस लाखांचा प्रदेश भारताला पाच ऑलिंपियन देतो. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रासाठी डोळे उघडणारी आहे. महाराष्ट्र गावागावांमध्ये “क्रीडा महर्षी” “क्रीडा विद्यापीठे” ,क्रीडा संकुले आहेत. पण ऑलिम्पियन खेळाडूंचा मात्र दुष्काळ आहे ही वस्तुस्थिती टोचणारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App