विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिहारमध्ये पाटण्यात सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीच्या बाता केल्या असल्या तरी प्रत्यक्षात विरोधी ऐक्याचे तारू जागा वाटपाच्या खडकावर फुटण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठा संघर्ष उडण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे गटाने 2019 च्या निवडणुकीतल्या शिवसेनेने जिंकलेल्या आपल्या सर्व म्हणजे 18 जागांवर दावा सांगून 20 जागा लढवण्याचा निर्धार केला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मात्र ठाकरे गटाला बाजूला सारत शिंदे गटाच्या खासदारांच्या 13 जागांवर डोळा ठेवल्याचे दिसत आहे.NCP – Congress keeps eye on shinde shivsena’s mp’s constituencies, to keep thackeray faction away
ठाकरे गटाकडे असलेले विद्यमान खासदार त्यांच्या जागा कायम ठेवून बाकीचे जागावाटप फेरवाटप पद्धतीने करण्याचा इरादा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दिसतो आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीचे जागावाटप चर्चेचा विषय असणार आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करून ठाकरे गटाला बाजूला सारून एकाकी पाडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी दुपारी ही बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने चंद्रपूरची एक जागा जिंकली होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर शिवसेनेचे १८ खासदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हाती घेतले आहे. त्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे.
काँग्रेसचा 20 जागांवर दावा
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार या पक्षाने २० लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, त्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेत्यांनी केला. हीच मागणी आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जोर देऊन रेटून नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे उपस्थित होते. वज्रमूठ सभांना अजून वेळ लागणार असल्याचे या नेत्यांनी मान्य केले.
वांद्रे येथील बीकेसी क्लबमध्ये काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आजच्या बैठकीत आम्हाला अनुकूल अशा २० मतदारसंघावर चर्चा झाली. अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. आमची पुढील बैठक ६ जुलैला आहे. त्यामध्ये काँग्रेस दावा करणाऱ्या मतदारासंघाची नावे निश्चित केली जातील.
राष्ट्रवादी देखील यात पुढे असून राष्ट्रवादीने आपले मतदारसंघ निश्चित करायला सुरुवात केली आहे त्यामुळे शिवसेनेच्या मूळच्या 18 जागा वगळून उरलेल्या फक्त 30 जागांवर जागावाटप करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाधान मानण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मतदारसंघांची खेचाखेच अपरिहार्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App