प्रतिनिधी
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादाचा दुसरा अध्याय आता चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून रंगायला लागला आहे. चिपी विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी काल दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिली. Narayan Rane and Shiv Sena lock horns over Chipi airport inaugartion program
त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, की चिपी विमानतळासाठी नारायण राणे यांनी १९९९ आणि २००९ या वर्षात २ वेळा भूमिपूजन केले. त्यानंतर २०१४ साली एमआयडीसी ने अहवाल दिला, त्यामध्ये फक्त १४ टक्के काम झाल्याचे सांगण्यात आले. २२ वर्षे राणे यांनी काही केले नाही. अखेर शिवसेनेच्या प्रयत्नाने हे विमानतळ उभे राहिले आहे, त्यामुळे नारायण राणे यांनी विमानतळाचे श्रेय लाटण्याच्या फुशारक्या मारू नयेत. त्यांचे पुत्र म्हणतात, ‘बाप असावा तर असा’, ठीक आहे बाप असावा पण तो आयत्या बिळावरचा नसावा, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
नारायण राणे यांनी मंगळवारी दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याचे श्रेय दुसऱ्या कुणाचे नाही. चिपी विमानतळाचे उदघाटन ७ ऑक्टोबरला नव्हे तर ९ ऑक्टोबरला होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्यालाच विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मागील २ वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतच्या ४ हवाई मंत्र्यांशी चिपीसाठी बैठका घेतल्या, आपण स्वतः ६ वर्षे पाठपुरावा करत आहोत. आता हे विमानतळ वाहतुकीसाठी तयार झाले आहे. या मार्गावर विमान वाहतूक करणाऱ्या एअर अलायन्स कंपनीने तयारी पूर्ण केली आहे. या मार्गावरील ७२ आसनी विमान मुंबईत दाखल झाले आहे.
कंपनीने मुंबई विमानतळात ७ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक करण्यासाठी दुपारचा १ वाजताचा स्लॉट बुक केला आहे. तसे पत्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना ७ ऑक्टोबर रोजी वेळ नाही, त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ९ ऑक्टोबर तारीख उदघाटनासाठी निश्चित झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यात संवाद होऊन हे ठरले आहे. असे असताना काहीही माहिती नसतात काही अज्ञानी मंडळी उगाच फुशारक्या मारत आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
शिवाय चिपी विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे आहे. एमआयडीसीने हे विमानतळ उभे केले आहे. त्याला केंद्राकडून केवळ परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे उदघाटनाला मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही, असे नारायण राणे कोणत्या धर्तीवर बोलतात? त्यांनी या विमानतळासाठी काय योगदान दिले, असा सवाल विनायक राऊतांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App