विशेष प्रतिनिधी
पुणे : महात्मा गांधींनी १९४२ ला ब्रिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ चा नारा दिला. त्यावेळी सत्याग्रही, क्रांतिकारकांनी आपापल्या मार्गांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. ब्रिटीशांविरोधात चळवळींनी जोर धरला होता. भूमिगत राहून कारवाया करणारी अनेक मंडळी सक्रिय होती. भास्कर कर्णिक ( रत्नागिरी) या विज्ञान पदवीधर युवकाचाही गट स्फोटकांच्या शोधात होता. Martyr Bhaskar Karnik Memorial Day Revolutionary work by bombing the cinema
कर्णिक स्वतः ऍम्युनेशन फॅक्टरीमध्ये नोकरीस होते. जेवण्याच्या डब्यातून ते बॉम्ब वा बॉम्बचे साहित्य घेऊन येत. ते तांबडी जोगेश्वरी मंदिरात ठेवण्यात येत असे. मंदिराचे पुजारी स्व. भालचंद्र बेंद्रे, स्व. नारायण आठवले व इतर काही लोक त्यांचे सहकारी होते. अनेक बॉम्बचा साठा त्यांनी करून ठेवला.
या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहातील स्फोटात वापरण्यात आले. दिनांक २४ जानेवारी १९४३ रोजी रात्री साडेनऊ वाजता पुणे कँटोन्मेंट भागातील कॅपिटॉल आणि वेस्ट एण्ड चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले, १४ जण जखमी झाले.
स्फोटाच्या तपासात बॉम्बच्या तुकड्यांवरून ते बॉम्ब देहूरोडच्या फॅक्टरीमधील असल्याचे समजले. कर्णिक यांना ३१ जानेवारी १९४३ रोजी पकडण्यात आले. यावेळी बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले अन्य क्रांतिकारक बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये यांनाही पकडून जेलमध्ये टाकले होते.
पैकी दत्ता जोशी यांना जेलमध्येच वीरमरण आले. अधिक तपासात पोलिसांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले.
कटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले पाहून व सहकाऱ्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये विचाराने कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. काही सेकंदात त्यांना वीरमरण आले. कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार नाहीसा झाला. कर्णिकांच्या आत्मार्पणामुळे अनेक क्रांतिकारक वाचले. ३१ जानेवारी हा त्यांच्या स्मृतिदिन. भास्कर कर्णिक शहीद झाले. त्याच परिसरात त्यांचे स्मारक उभे आहे.
काँग्रेस विद्यार्थी संघटना NSUI ने सायंकाळी जोगेश्वरी मंदिर ते हुतात्मा कर्णिक स्मारक अभिवादन फेरी, आणि स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. स्व. भालचंद्र बेंद्रे यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App