बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणारे सभापती म्हणून मनोहर जोशी लक्षात राहतील. Manohar Joshi, eradicater of Mumbai riots blame on shivsena
मनोहर जोशी बाळासाहेबांच्या शिवसैनिक. पहिल्या फळीतले नेते. त्यांच्यामागे ते सावलीसारखे वावरले. बाळासाहेब म्हणतील ती पूर्व हे केवळ “राजकीय सत्य” म्हणून नव्हे, तर ते सत्य मनापासून स्वीकारणारे शिवसैनिक होते. त्यामुळे शिवसेनेच्या जन्मापासून ते अखेरपर्यंत ते शिवसैनिकच राहिले. अधेमध्ये ते मुख्यमंत्री पद, लोकसभेचे सभापती असे पद भूषविते झाले, पण ही सगळे आपल्याला ही सगळी पदे आपल्याला बाळासाहेबांनी दिली, हे मनोहर जोशी कधीच विसरले नाहीत!!
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात गुंड – पुंडांचा मेळावा म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे. काँग्रेसवाले शिवसेनेला “वसंत सेना” म्हणून चिडवायचे. पण मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोन शिवसैनिकांनी शिवसेनेची ओळख मराठी तरुणांना मार्गावर आणणारी सेना अशी मिळवून दिली. सुधीर जोशी यांना बाळासाहेबांनी लोकाधिकार समितीचे अध्यक्ष केले आणि त्यांनी मराठी तरुणांच्या नोकरी व्यवसायांसाठी चिरस्थायी राहणारे काम करून ठेवले. “कोहिनूर” सारख्या उद्योग समूहाची स्थापना करून मनोहर जोशींनी स्वतःला स्थैर्य प्राप्त करून घेतलेच, पण त्याच वेळी शिवसैनिकांसाठी देखील एक उद्योग प्रस्थापनेचा आदर्श घालून दिला.
शिवसेनेच्या चढत्या, उतरत्या, पुन्हा चढत्या अशा सर्व काळात मनोहर जोशी बाळासाहेबांबरोबर सावलीसारखे राहिले. बाळासाहेबांनी त्यांना पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री केले, त्यावेळी त्यांच्यावर शरद पवारांचा प्रभाव होता, असे मानले गेले. ते प्रशासकीय दृष्ट्या काही अंशी खरे देखील होते. कारण त्यावेळी प्रशासनात शरद पवारांचा “अदृश्य” प्रभाव होता. परंतु, या “अदृश्य” प्रभावाने ज्यावेळी, शिवसेनेवरच मुंबई दंगलीचे किटाळ आणून संघटनेला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मात्र शरद पवारांनी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल फेटाळण्याचे प्रचंड धैर्य मनोहर जोशींनी भर विधानसभेत दाखविले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या सरकारने श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल फेटाळून शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर केले होते.
प्रखर हिंदुत्ववादी
1992 मध्ये बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबई दाऊद सारख्या जिहाद्यांनी ताब्यात घेऊन तिथे बॉम्बस्फोट घडविले. दंगली घडविल्या आणि हिंदू विरोधात वातावरण पेटवले होते. त्याला पवारांच्या प्रशासनाची फूस होती, असे बोलले जात असे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, मधुकर सरपोतदार, दत्ताजी साळवी यांच्यासारख्या प्रखर हिंदू नेत्यांनी मुंबई वाचवली. कडवट शिवसैनिक मुंबईच्या रस्त्यावर उतरला होते. त्यांनी मुंबईतला हिंदू समाज वाचविला. पण शरद पवारांनी नेमलेल्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाने शिवसेनेवर दंगलीचे किटाळ आणले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण आयोगाला कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आयोगाच्या अहवालात बाळासाहेबांवर थेट ठपका ठेवता आला नाही, पण बाकीच्या सर्व नेत्यांवर मात्र श्रीकृष्ण आयोगाने दंगलीचा ठपका ठेवला होता. शिवसेना – भाजप युतीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी श्रीकृष्ण अहवाल सरकार फेटाळत असल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. त्यावेळच्या राजकीय वातावरणात हे धाडस करणे फार अवघड होते, पण बाळासाहेबांचे नेतृत्व मानत प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मनोहर जोशींनी हे धाडस केले होते.
जसे श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल फेटाळून मनोहर जोशींनी शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर केले, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिल्या चित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावून स्वातंत्र्यवीरांचा उचित सन्मान करण्याचे राजकीय धैर्य लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यांनीच दाखविले होते.
उत्तम संवाद कौशल्य
संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र लावावे, हा निर्णय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा होता. परंतु, त्यात बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. सभापती मनोहर जोशींनी तैलचित्र लावण्यासाठी नेमलेल्या समितीत त्या वेळचे काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असलेले शिवराज पाटील आणि प्रणव मुखर्जी यांचाही समावेश होता. शिवराज पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी देखील काँग्रेसच्या वतीने सावरकरांचे तैलचित्र संस्थेतल्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यास संमती दिली होती. मनोहर जोशींच्या राजकीय संवाद कौशल्यामुळे हे शक्य झाले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेसने सोनिया गांधींच्या काळात आपली भूमिका बदलली, पण त्याआधी काँग्रेसला देखील आपल्या बाजूने वळवण्याचे कौशल्य मनोहर जोशींनी दाखविले होते. त्यामुळे मनोहर जोशी आपल्या वेगवेगळ्या राजकीय कौशल्यांमधून महाराष्ट्राच्या जेवढे लक्षात राहतील, त्याहीपेक्षा ते अधिक शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावणारे लोकसभेचे सभापती म्हणून अधिक लक्षात राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App