विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra ZP Elections 2026 राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडेल. अजित पवार यांच्या निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.Maharashtra ZP Elections 2026
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल, तर 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक मतदाराला पांढऱ्या ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी आणि गुलाबी ईव्हीएमवर पंचायत समितीसाठी अशी दोन मते द्यायची आहेत. एकूण 2 कोटींहून अधिक मतदार असून 25,471 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी व पंचायत समितीच्या 1,462 गणांसाठी असे एकुण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी 1.28 लाख कर्मचारी नियुक्त केल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.Maharashtra ZP Elections 2026
एकूण जागा आणि उमेदवार
सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
सर्व 125 पंचायत समित्या मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदार आणि मनुष्यबळ
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला; तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण 25 हजार 471 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 1 लाख 28 हजार इतक्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यात सुमारे 125 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 125 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ईव्हीएमची व्यवस्था
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 51 हजार 537 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.
दोन मते देणे अपेक्षित
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर (बीयू) पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असते. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जातो.
मतदारांचे नाव शोधण्याची सुविधा
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ (Matadhikar) हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. त्याचबरोबर व्हिलचेअरचीही व्यवस्था केली जाईल; तसेच मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे
प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा दोन मतांचा हक्क आहे. मतदान करण्यासाठी सोबत मतदान कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, भारतीय पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड आदींपैकी एक ओळखपत्र सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक संवेदनशील 34 केंद्रे सिल्लोडमध्ये
जिल्ह्यातील 2282 पैकी 54 केंद्रे ही संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक 34 केंद्रे ही सिल्लोड तालुक्यात आहेत, तर कन्नड 16, आणि वैजापूरमध्ये 4 केंद्रांचाही समावेश आहे. याखेरीज जिल्ह्यात 257 केंद्रे ही परदानशीन असतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App