विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे अयोध्येच्या राम मंदिरातल्या सोहळ्याचा देशभर जल्लोष सुरू असताना दुसरीकडे राम मंदिराचे विरोधक वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याच पक्षांना अडचणीत आणल्याची उदाहरणे वाढत आहेत. यातलेच एक उदाहरण शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पेश केले आहे. राम मांसाहारी होता. तो बहुजनांचा देव होता, असे वादग्रस्त वक्तव्य करून आव्हाडांनी शरदनिष्ठ राष्ट्रवादीला अडचणीत आणले आहे, त्यामुळेच आव्हाडांच्या वक्तव्यापासून हात झटकून बाजूला होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची लटपट महाराष्ट्रासमोर उघडी पडली आहे. Jitendra awhad’s statement about non vegetarian Ram, sparked row in NCP itself
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन देखील सुरू केले आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत. अशातच आव्हाडांच्या वक्तव्यापासून हात झटकून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी आव्हाडांना पक्षात एकाकी पाडले आहे.
आव्हाडांचे वक्तव्य आल्याबरोबर सुरुवातीलाच जयंत पाटलांनी त्या वक्तव्यापासून हात झटकले. श्रीरामाच्या मुद्द्यावरून शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणाले, तर रोहित पवारांना आव्हाडांच्या वक्तव्यावर ट्विटर पोस्ट लिहावी लागली. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणे, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे, असे ट्विट रोहित पवारांना करावे लागले.
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तीगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचे राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ… या राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असे जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात बोलताना म्हटले होते.
या शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाडांना या विषयावर प्रश्न केले, तेव्हा ते म्हणाले, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० % लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत!!
मात्र, याच वक्तव्यामुळे शरदनिष्ठ राष्ट्रवादीला झटका बसला आणि त्यांच्या नेत्यांनी आपले हात जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यापासून झटकण्याचा प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App