पदमुक्त झाल्यावर जयंत पाटलांभोवती घट्ट झाले संशयाचे जाळे; अनेकांना करावे लागताहेत वेगवेगळे खुलासे!!, अशी अवस्था राष्ट्रवादीचे पदमुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भोवती तयार झालीय.
अखंड राष्ट्रवादीचे ते फुटलेली राष्ट्रवादी अशी तब्बल सात वर्षे जयंत पाटलांनी महाराष्ट्रातली राष्ट्रवादी सांभाळली. राष्ट्रवादी फुटेपर्यंत त्यांच्या निष्ठांची कधी कुणी शंका घेतली नाही. फक्त अधून मधून त्यांच्या भाजप प्रेमाविषयी चर्चा होत राहिली. पण त्यांनी अधिकृतपणे शरद पवारांची साथ सोडली नाही. अजितदादा भाजपच्या वळचणीला निघून गेल्यानंतर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महाराष्ट्रातील केंद्रस्थानी आले. ते भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद पटकावणार अशी चर्चा सुरू झाली. जयंत पाटलांना त्या संदर्भात वारंवार खुलासा करावा लागला. जलसंपदा खाते मिळत नाही म्हणून जयंत पाटील तिथे जात नाहीत, अशाही चर्चा रंगल्या. पण गेल्या दीड दोन वर्षांमध्ये जयंत पाटलांच्या भोवतीचे संशयाचे जाळे घट्ट होत गेले. त्यांना अनेकदा खुलासे करावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या तरुण नेत्यांनी जयंत पाटलांच्या विरोधात शरद पवारांकडे कागाळ्या केल्यानंतर देखील पवारांनी जयंत पाटलांना लगेच पदमुक्त केले नाही, तर तक्रारीनंतर काही महिन्यांनी पदमुक्त केले. जयंत पाटील पदमुक्त झाल्यानंतर भाजपकडे वळतील, अशा अटकळी आपोआपच बांधल्या जाऊ लागल्या.
याच विषयावर सगळ्यांनी त्यांना खुलासे करत बसावे लागले. जयंत पाटील आमच्याकडे येणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादीतला प्रदेशाचा अध्यक्ष बदलणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे दोघांनी सांगितले. अजित पवारांनी जयंत पाटलांच्या पदमुक्तते विषयीचा प्रश्न आणि भाजपा प्रवेशा संबंधातला प्रश्न टाळला. पण त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र जयंत पाटलांच्या स्वागताची तयारी दाखविली.
पण जयंत पाटील पद मुक्त झाले तरी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून पळून जाणार नाहीत, असे खोचक वक्तव्य रोहित पवारांनी केले. म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तरी ते पळून गेले, असे narrative रोहित पवारांनी आधीच सेट करून ठेवले.
– पवारांच्या रांगेत जयंत पाटील
या सगळ्या राजकारणात जयंत पाटलांचे कुठेच काही जमेनासे दिसून आले. शरद पवारांना जसे त्यांचे समर्थक वर्षानुवर्षे पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करत राहिले, पण प्रत्यक्षात ते कधी पंतप्रधान झालेच नाहीत. अजित पवारांना त्यांचे समर्थक मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत राहिले, पण त्या पदाने कायमच त्यांना हुलकावणी दिली, तसेच जयंत पाटलांचे झाले. जयंत पाटील शरद पवारांपासून बाजूला होऊ शकले नाहीत. त्यांनी बाजूला व्हावे, असे कुठले ठोस कारण त्यांना दिसले नाही. भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जयंत पाटलांना हवे ते पद देण्याची तयारी दाखविली नाही त्यामुळे जयंत पाटलांची राजकारणात कुचंबणा झाली. आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त झाल्यावर सध्या तरी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष एवढेच पद त्यांच्याकडे उरलेय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App