वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jalil बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेले वक्फ दुरुस्ती विधेयक 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केले जाणार आहे. मात्र, मुस्लीम समाजाकडून या विधेयकाला विरोध दर्शवण्यात येत आहे. आता यावर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी सरकारवर हल्ला चढवला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी का तयार केली? असा सवालही जलील यांनी सरकारला केला.Imtiaz Jalil
इम्तियाज जलील म्हणाले, वक्फ बोर्डा संदर्भात जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये आमच्या पार्टीचे असदुद्दीन ओवैसी यांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी बजावली होती. जॉईंट पार्लमेंटरी समितीने आपला रिपोर्ट पार्लमेंटला सादर केलेला आहे. परंतु त्यापूर्वीच या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जे समितीने निर्णय घेतले आहे ते रद्द करण्यात आले आहेत. जर तुम्हाला समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले? लोकांचे पैसे आणि वेळ का वाया घातला? तुम्हाला तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर कशाला ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार केली? असे सवाल जलील यांनी उपस्थित केले.
…तर इतर जातीधर्माच्या बोर्डमध्ये आमचे लोक टाका
सरकारकडे आकडे आहेत आणि म्हणूनच वक्फ बोर्डाच्या या बिलाला चंद्रबाबू नायडू, नितेश कुमार आणि अजित पवार यांनी या बिलाला उघड सपोर्ट केलेला आहे. आम्ही त्या बिलाला विरोध केलेला आहे. आमची सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे आणि कोर्टाने जर सांगितले हे बरोबर आहे, तर ते आम्ही मान्य करू. कारण न्याय प्रणालीवर मुसलमानांचा विश्वास आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले. वक्त बोर्डाची जी संपत्ती आहे, ती मुस्लिम समाजाची संपत्ती आहे. मुस्लिम समाजाने दान केलेली ही सर्व मालमत्ता आहे. ही काही तुमची जहागीर नाही. म्हणजे माझ्या भाषेत बोललो तर पप्पाची जहागीर नाही, असे म्हणत बोर्डावर तुमचे लोक येत असतील तर इतर जाती धर्माचे जे बोर्ड आहेत त्यांच्यातही आमचे लोक टाका, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील गुंडाराज महाराष्ट्रात नको
इम्तियाज जलील यांनी रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत झालेल्या स्फोटावरही भाष्य केले. या मस्जिद स्फोटात बीड पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्यावर मी सुरुवातीला समाधानी होतो. परंतू पोलिसांनी एफआयआरमध्ये जी कलमे लावली आहेत, युएपीएनुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यावर मी मात्र समाधानी नाही. ज्या पध्दतीने स्फोट करणाऱ्यांनी सिगरेट पीत आणि इंस्टा रील्स करत मशीदमध्ये स्फोट घडवला. त्यावरून असे दिसते की त्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशामध्ये सुरू असलेले गुंडाराज महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे आणि महाराष्ट्राला शांती हवी आहे. अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App