विशेष प्रतिनिधी
पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘संस्थेचे भूषण आता पद्मविभूषण’ या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. Dr. Prabha Atre felicitated in honor of Padma Vibhushan; Program of Rasta Peth Education Society
बांधकाम व्यावसायिक नितीन न्याती, उपाध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष संजीव महाजन,प्रसाद भडसावळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अत्रे यांच्या कारकिर्दीवर आधारित ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आल्यानंतर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. अत्रे यांना मानवंदना दिली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अत्रे म्हणाल्या, ईश्वराने मला संगीतरुपी आशीर्वाद दिला. संगीताने माझे आयुष्य समृद्ध केले, जे सुंदर, शाश्वत आहे. त्याची ओळख संगीतानेच करून दिली. कोणत्याही क्षेत्रातील साधनेची वाट पूर्णत्वाच्या शोध घेणारी असते. ती कधीही न संपणारी असते. हे मी अनुभवते आहे. या वाटेवर असंच चालत ठेवा, हीच प्रार्थना,’ अशी कृतार्थ भावना डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.
माझे आई-वडील आणि गुरू आज नाहीत. या शाळेचा आणि माझा रक्ताचा संबंध आहे. वडील म्हणायचे माझ्या शाळा, प्रभा आणि उषा या तीन मुली आहेत. या शाळेरुपी मोठ्या बहिणीने आज माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली ती माझ्या आई-वडिलांचा आणि गुरुजनांची आहे, हे सांगताना प्रभाताईचा कंठ दाटून आला.
कुठल्याही साधनेच्या वाटेवर आपल्या माणसांच्या सदिच्छा, प्रोत्साहन आणि आशीर्वाद नसतील तर त्या वाटेवर पावले पुढे जात नाहीत. माझी वाटचाल याच शाळेपासूनच सुरू झाली. प्रत्येक क्षेत्रात एक नंबरची जागा रिकामी असते तिथे पोहोचल्यावर ती जागा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असते, असे त्यांनी नमूद केले.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा सन्मान करताना डावीकडून : संजीव ब्रह्मे, प्रसाद भडसावळे, शंकर अभ्यंकर, डॉ. प्रभा अत्रे, नितीन न्याती, भारत वेदपाठक, संजीव महाजन.
भारताने जगाला अध्यात्म्य आणि संगीत या दोन देणग्या दिल्या. या दोन्हींमुळे भारताला समृद्ध, श्रीमंत अशी परंपरा लाभली आहे. त्यांनी भारतीयांचे भावजीवन समृद्ध केले. या विद्या प्रदान करणारे शिक्षा गुरू आणि दीक्षा गुरू असतात. आबासाहेब अत्रे शिक्षा आणि डॉ. प्रभा अत्रे दीक्षा गुरू आहेत, असे गौरवोद्गार डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले. नितीन न्याती यांनीही आपले विचार व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिक्षण व संगीत क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App