विशेष प्रतिनिधी
पुणे : एरवी महाराष्ट्राने टिळक पगडी की फुले पगडी यावर निर्माण केलेला वाद पाहिला. त्यातून ज्येष्ठ नेत्यांनी निर्माण केलेले जातीय तणाव सहन केले. पण आळंदीतल्या संत संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीने महाराष्ट्राचे अवघे समाजमन जिंकले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातल्या विविध संप्रदायांच्या संत समाजाने मतदारांमध्ये प्रचंड मोठी जागृती केली. ठिकठिकाणी व्याख्याने, कीर्तने, संमेलने आयोजित करून मतदारांना मतदानाचे सामाजिक महत्त्व पटवून दिले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात महायुतीचा प्रचंड विजय झाला. या सगळ्या संत समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य गोविंद गिरीदेव महाराज यांच्या पुढाकाराने आळंदी मध्ये काल संत संवाद कार्यक्रम झाला. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या संत समाजावर पुष्पवृष्टी करून संतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पण या कार्यक्रमातल्या फडणवीस यांच्या एका कृतीने सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले. संत समाजाने फडणवीस यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांना शाल, मोरोपंखांचा हार घातला. शिवछत्रपतींची प्रतिमा दिली आणि त्यांना शिवछत्रपतींचा जिरेटोप परिधान करायला दिला. त्यावेळी फडणवीस यांनी तो जिरेटोप सन्मानपूर्वक हातात घेतला, पण मस्तकावर परिधान करायला नकार दिला. फडणवीसांनी तो जिरेटोप परिधान करावा, यासाठी संतांनी आग्रह धरला. पण फडणवीस यांनी नम्रपणे नकार देत तो जिरेटोप परिधान न करता हातात घेऊन तो मस्तकी लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच!!, हे फडणवीस यांनी कृतीतून दाखवून दिले त्यातून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App