महायुतीचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकार स्थापन होऊन आता महिना अखेर होत आला, तरी सरकार मधल्या काही अंतर्गत संघर्षामधून फडणवीस सरकारची सुटका होताना दिसत नाही. हा अंतर्गत संघर्ष भाजप मधला नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला देखील नाही. तो अंतर्गत संघर्ष आहे, महायुतीमध्ये भाजपने सामावून घेतलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. Devendra Fadnavis
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या मूळ राजकीय प्रवृत्तीनुसार जातीय संघर्षाचा इतिहास आणि वर्तमान आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन करताना त्याच्या पहिल्या प्रदेध्यक्षपदी जरी मधुकर पिचड यांच्यासारख्या आदिवासी नेत्याला संधी दिली असली, तरी मूळात राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती “मराठा वर्चस्ववादी”च राहील, याची काळजी आणि दखल शरद पवारांनी सुरुवातीपासून घेतली. तोच वारसा आज अजितदादा पुढे चालवताना दिसत आहेत. अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले, तरी त्या वारशापासून दूर गेलेले नाहीत, हेच राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांच्या वर्तणुकीवरून दिसून येते.
राष्ट्रवादीत नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव कोकाटे, तर बीड जिल्ह्यात मुंडे बंधू-भगिनींविरुद्ध सुरेश धस हा संघर्ष राहिला. याला निश्चित जातीय किनार होती आणि आहे. त्याचेच पडसाद आज महायुती सरकारच्या सुरुवातीच्याच कारकिर्दीत उमटताना दिसत आहेत. सुरेश धस आज जरी आष्टी मधून भाजपच्या कमळ चिन्हावर विधानसभेवर निवडून आले असले, तरी ते मूळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांची मूलभूत राजकीय प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रितच राहिली आहे म्हणूनच ते भाजपच्या शिस्तीची चौकट मोडून थेट मुंडे बंधू-भगिनींवर हल्ला चढवताना दिसत आहेत. भाजपने अजून तरी त्यांना अटकाव केल्याचे चिन्ह दिसलेले नाही.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगातील संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मीक कराड अडकल्याचे सकृतदर्शनी दिसत असताना अद्याप त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे त्या एकूणच प्रकरणाला आता जातीय रंग आला आहे. सुरेश धस विधानसभेपासून ते दररोजच्या पत्रकार परिषदेपर्यंत त्यामध्ये रोज भर घालत आहेत.
Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
वाल्मीक कराडचा बचाव करताना धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी जवळ जी बॉडी लैंग्वेज वापरली, तिचा उल्लेख करताना सुरेश धस यांनी काँग्रेसी संस्कृतीतल्या नेत्यांचा उल्लेख केला. विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, आर. आर. आबा पाटील यांना कशासाठी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, याची आठवण त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना करून दिली. भाजपच्या शिस्तीच्या चौकटी बाहेर गेलेले हे प्रकरण आहे.
इथे धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड यांना वाचवण्याचा किंवा त्यांचे समर्थन करण्याचा मुद्दा नाही ते दोषी असतील, तर त्यांना कायदेशीर पातळीवर धडा शिकवला गेला पाहिजे पण राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीतून त्याकडे जातीय अँगलनेच पाहावे याची बिलकुल गरज नाही. पण या सगळ्या प्रकरणाची झळ महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला बसत असल्याने त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातल्या जुन्या संघर्षाची झळ अशीच महायुती सरकारला बसत आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारले, तो विषय त्यांनी सगळ्या ओबीसी समाजाशी जोडला, तो मराठा समाजातले असलेल्या माणिकराव कोकाटे यांना खटकला. त्यांनी भुजबळांचा जातीयवाद उघडपणे बाहेर काढला. भुजबळांना ओबीसी म्हणून फक्त स्वतःचा मुलगा आणि पुतण्यास दिसतात असे टीकास्त्र त्यांनी सोडले. यातून नाशिक जिल्ह्यातल्या दोन वरिष्ठ नेत्यांचा बेबनाव महायुतीच्या फडणवीस सरकारला चटका देऊन जातो आहे.
सामंजस्याचे रूपांतर गुळगुळीतपणात नको
या सगळ्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आज जरी मुख्यमंत्री या नात्याने सामंजस्याची भूमिका घेतली असली, तरी ती कायम ठेवणे आणि तिचे रूपांतर गुळमुळीत भूमिकेत होणे हे सरकारसाठी फारसे चांगले लक्षण ठरण्याची शक्यता नाही. कारण जी काही प्रतिमा हानी होते आहे, ती फडणवीस सरकारची आणि भाजपची होते आहे. त्याची जी काही राजकीय किंमत चुकवावी लागेल, ती भाजपला लागेल.
म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राष्ट्रवादी मग अजित पवारांची असो किंवा अन्य कोणीही असो, त्यांना तुम्ही भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आला आहात. इथे महायुती सरकारच्या शिस्तीमध्येच वागावे लागेल. काँग्रेसी संस्कृतीतली वर्तणूक इथे चालायची नाही, हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. अन्यथा महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार किंवा काँग्रेसी संस्कृतीतले काँग्रेस – राष्ट्रवादी यांचे सरकार यामध्ये गुणात्मक फरक शिल्लक राहणार नाही. तो गुणात्मक फरक दाखवण्याची जबाबदारी आणि अधिकार मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवारांशी असलेल्या राजकीय मैत्रीची पत्रास एका मर्यादेपलीकडे ठेवण्याची आवश्यकता नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App