विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटच्या आधारावर अखेर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांना मागे रेटलेच. लोकसभा निवडणुकीत 14 खासदारांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी 2024 च्या विधानसभेच्या जागा वाटपात आपल्या हक्काच्या पहिल्या नंबरच्या जागा वसूल करून दाखविल्या. त्यासाठी ठाकरे आणि पवारांना तडजोड करायला भाग पाडले. Congress strike thackeray pawar in vidhansabha
महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीच्याही गेल्या काही दिवसांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे. जवळपास निश्चितही झालेला आहे. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील समाजवादी पक्ष आणि शेकाप सारख्या पक्षांना 3 ते 5 जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवस मविआच्या मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. या तीन बैठकांमध्ये जागावाटप अंतिम होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
कोणता पक्ष किती जागांवर लढणार?
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे शिवसेना 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत 7,8 आणि 9 तारखेला बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे.
जागावाटप कसं ठरतंय?
जागा वाटपात बाकी कुठल्याही अन्य निकषांपेक्षा 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेटच निर्णायक ठरला. लोकसभा निवडणुकीत 17 जागांवर लढून काँग्रेसने 14 खासदार जिंकले, तर ठाकरे गटाने 21 जागा लढवून 9 खासदार जिंकले. शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आणले. मुख्यमंत्रीपदाचा दावा मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेस सर्वाधिक जागा लढत आहे, तर ठाकरे गटही मुख्यमंत्रीपदासाठी तसा प्रयत्न करत आहे. त्यात पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाविकास आघाडीत गेल्या चार दिवसांपासून विदर्भावरुन तिढा निर्माण झाला होता. काँग्रेसला विदर्भात सर्वाधिक जागा हव्या होत्या. पण ठाकरे गटाचा देखील त्या जागांवर दावा होता. लोकसभेला आम्ही अमरावती आणि रामटेक या सिटिंग जागा दिल्या. त्यामुळे विदर्भातही आम्हालाही जागा हव्या आहेत, असा ठाकरे गटाचा दावा होता. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत जागावाटपावेळी खटके उडाले होते. पण आता वाद मिटले आहेत. पुढच्या तीन बैठकांमध्ये अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “अजून आमची चर्चा पुढे सरकते आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष जरी असले तरी इतक घटक पक्ष जे आमच्यासोबत लोकसभेला होते, त्यांना कसं सामावून घेता येईल याबाबत आम्ही चर्चा केली. जागावाटपाची चर्चा आता जवळपास संपुष्टात आली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ज्याअर्थी महाविकास आघाडीत छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरनी सेटलमेंट केलेली आहे. सिटिंग आमदारांच्या मतदारसंघांना शक्यतो हात लावायचा नाही असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App