हे अभियान राज्यासाठी आरोग्यदायी, सुख, समृद्धी आणि संपन्नतेचं महाद्वार ठरेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतादूतांशी संवाद साधला. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde launched the Maha Swachhata Abhiyan
संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून नकारात्मक, अस्वच्छ आणि घाण मुळापासून धुवून काढणार आहोत. हे अभियान आता जनतेचं अभियान आहे, मुख्यमंत्री किंवा महानगरपालिकेचं हे अभियान नाही, ही एक लोकचळवळ झाली पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
याशिवाय आजचा २०२३चा शेवटचा दिवस आहे. हा दिवस संस्मरणीय ठरणारा आहे. आजपासून आपण महा स्वच्छता अभियानाच्या म्हणजेच मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्हचा या ऐतिहासिक स्थळावरून शुभारंभ करतोय. नवं वर्ष २०२४ स्वच्छतेचा एक महासंकल्प घेऊन येणार आहे. गेट-वे-ऑफ इंडियावरून सुरू होणारं हे अभियान राज्यासाठी आरोग्यदायी, सुख, समृद्धी आणि संपन्नतेचं महाद्वार ठरेल असा विश्वास आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर आम्ही स्वच्छ मनानं ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. प्रत्येक शहर स्वच्छ झालं तरच ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ असं आपल्याला अभिमानानं म्हणता येईल. त्यामुळे हे महास्वच्छता अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मी प्रत्येक नागरिकाला करतो. महाराष्ट्राला पुन्हा एकदा सर्व प्रकारे स्वच्छ करण्याचा विडा आम्ही आता उचलला आहे. आता सुरू केलेली स्वच्छता मोहीम ही महाराष्ट्राचे रूप पालटल्याशिवाय थांबवणार नाही. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘अर्बन फॉरेस्ट’ची संकल्पना राबविण्याचा आमचा मानस असून ठाण्यात कालच अशा प्रकारच्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. कोपरी पासून गायमुख पर्यंत आनंदवन पट्टा तयार करत आहोत. शहरातील पायाभूत सुविधा उभ्या करतानाचा पर्यावरणाचा समतोल आपल्याला ठेवावा लागणार आहे. विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुन्हा रोपण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेला दिल्या.
सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आजचा हा कार्यक्रम बघत आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेची एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) समजून घेऊन आपल्या क्षेत्रात हे अभियान यशस्वीपणे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शहर, गाव आणि महामार्गाच्या बाजूचा कचरा उचलून स्वच्छता करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीमध्ये नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App