महाराष्ट्राच्या समाजकारणाला आणि राजकारणाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. यातून काही चांगल्या बाबी घडल्या तर काही घटनांमुळे अकारण त्वेष, द्वेष आणि परस्परांबद्दलचा अविश्वास वाढीस लागला. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा नवा ग्रंथ येतो आहे. ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद-विवेकवादी भूमिका’ असेच या ग्रंथाचे नाव आहे. Chhatrapati Shivaji and Brahmin-non-Brahmin disputes, A book is coming penned by Dr. Shripal Sabnis
विशेष प्रतिनिधी
पुणे : “खरेतर छत्रपतींचे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या रयतेचे एकसंध स्वराज्य होते. पण त्याच वारशातील आजचा महाराष्ट्र जातीधर्मात विघटीत झाला आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर जातीच्या विद्वानांनी छत्रपतींच्या नावाने निर्माण केलेल्या संघर्षातून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्राच्या शुद्ध कर्तृत्वाची सुटका केलेली आहे,” असे मत सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
डॉ. सबनीस यांनी लिहिलेल्या “छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद: विवेकवादी भूमिका” या ग्रंथाची घोषणा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नुकतीच डॉ. मुजुमदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या ग्रंथाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी काढले असून मुखपृष्ठाचे अनावरण डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमास डॉ. सबनीस उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले की, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्र व देशाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हाच वाद छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला देखील आला.
वर्तमानात महाराष्ट्रामध्ये जातीपातीची भांडणे वाढली परंतु डॉ. श्रीपाल सबनीस यांनी विवेकवादी भूमिका स्वीकारून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जातीवादी दोन्ही प्रवाहांच्या शत्रुत्त्वातून मुक्त केले आहे. डॉ. सबनीस यांचा नवा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्र व चारित्र्याला सर्वार्थाने न्याय देणारा आहे.
ग्रंथ लेखनाची भूमिका मांडताना डॉ. सबनीस म्हणाले, की शिवराज्याभिषेक दिनी स्वराज्यातील मावळ्याप्रमाणे वर्तमानात महाराष्ट्रातील जनतेची एकात्मता कायम राहावी म्हणून आपण शिवरायांचा अभ्यास संशोधनाच्या पुराव्याद्वारे ग्रंथात मांडला.
डॉ. पवारांची सविस्तर प्रस्तावना
“छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद: विवेकवादी भूमिका” या डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ४३२ पानी ग्रंथाचे प्रकाशन “सत्यम प्रकाशन” तर्फे येत्या १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.
या ग्रंथाला कोल्हापूर आणि सातारा येथील छत्रपती शिवरायांच्या दोन्ही वंशजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या ग्रंथासाठी २२ पानांची प्रस्तावना दिलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App