प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूर दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना पवारांनी संपूर्ण भाषणात केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धारेवर धरले. पण प्रत्यक्षात राजकीय खेळी करून त्यांनी काँग्रेस फोडून त्या पक्षाचे नेते राष्ट्रवादीत सामील करून घेतल्याचे दिसून आले.BJP on “Target” in Sharad Pawar’s speech in Solapur; Only Congress broke
उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारावरून त्यांनी भाजपचे अक्षरश: वाभाडे काढले. शेतकऱ्यांचे रक्त सांडणार्या भाजपला या देशाची संस्कृती माहिती नाही. त्यांनी सत्तेवर येताच शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असे एका पाठोपाठ एक आरोप केले. येत्या 11 तारखेला महाविकास आघाडीने लखीमपूर हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
मात्र एकीकडे भाषणात भाजपवर जबरदस्त प्रहार करत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष राजकीय खेळी करत पवारांनी सोलापुरात काँग्रेस पक्ष सोडला आहे. पवारांचे मित्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती नेते काँग्रेस मधून राष्ट्रवादी मध्ये सामील करून घेतले आहेत.
यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीची प्रचाराची जबाबदारी सांभाळलेले माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. हे नेते सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
त्यांच्यासमवेत काँग्रेसचे सुमारे 40 स्थानिक नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुका आघाडी करून लढवू इच्छिते. परंतु, तशी आघाडी झाले नाही तर आपण स्वबळावर लढू, अशी घोषणा देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली आहे. राष्ट्रवादीचे हे “स्वबळ” वाढविण्यासाठीच पवारांनी ही राजकीय खेळी करून काँग्रेसमधल्या सुशीलकुमार शिंदे समर्थकांना आपल्या पक्षात खेचून घेतल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App