विशेष प्रतिनिधी
शिर्डी : शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली आहे. ही अवस्था महाराष्ट्रातील मतदारांनी केली आहे, अशी जहरी टीका मुंबई प्रदेश भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर खरपूस टीकाही केली. शेलार म्हणाले, “शरद पवार म्हणत होते की राज्यातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून मोठं बंड उभं राहिल, संविधान बदलेल, आरक्षण जाईल, तीन राज्यात भाजपा जिंकली तरी महाराष्ट्रात परभाव होईल. शरद पवारांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली नाही? मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच, पण काही भाटही त्यांनी पाळले. त्या भाटांनी वर्णनही केलं की भाजपा ६० पेक्षा पुढे जाणारच नाही.
शेलार म्हणाले, मडके विकणाऱ्या व्यापारांना आणून सल्लागार केलं. जो मिळेल त्याला सल्लागार केलं गेलं. त्या बिचाऱ्या मडके विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या लक्षातच आलं नाही की मडके विकणाऱ्या सल्लागार का बनवलं? सरदाराने विचारलं मानधन किती घेणार? ५०० रुपये घेणाऱ्या भटाऐवजी मडके विकणारा म्हणाला १०० रुपये घेईन. एकदा सरदाराला शिकारीला जायचं होतं. त्याने व्यापाराला विचारलं ढग येणार आहेत का? व्यापारी म्हणाला १० मिनिटे थांबा, मी माझ्या गाढवाला विचारून येतो. गाढवच मला सांगतो की ढग येणार की नाहीत. सरदार मोठा शहाणा निघाला. त्याने पंडिताला आणि व्यापाऱ्याला काढलं. त्याने गाढवालाच सल्लागार बनवलं.”
“उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला गुलामीत टाकू पाहत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे सांगत होते, वातावरण निर्मिती करत होते, सांगत होते की अब की बार भाजपा तडीपार, महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करा, अशा प्रकारची वल्गना उद्धव ठाकरे करत होते. पण मी एक कार्यकर्ता म्हणून उद्धव ठाकरे यांचं ते ३१ जुलैचं भाषण कधीही विसरू शकत नाही”, असं म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App