राष्ट्रवादीतल्या शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात पहिल्या फेरीत आज अजितदादांनी शरद पवारांवर मात केली. आमदार संख्येच्या बाबतीत दोन्ही गटांनी प्रत्यक्ष संख्या गुलदस्त्यात ठेवली असली, तरी अजितदादांच्या हातात 40 आमदारांच्या सह्या असलेली प्रतिज्ञापत्रे आहेत. त्याचबरोबर अजित पवारांच्या आजच्या मेळाव्यात 36 आमदार उपस्थित होते, तर शरद पवारांच्या मेळाव्यात यशवंतराव सेंटरमध्ये 12 आमदार उपस्थित होते आणि 3 आमदार नंतर आले, अशा बातम्या आहेत. मात्र दोन्ही गटांनी अधिकृतरित्या आमदार संख्या जाहीर केलेली नाही. त्या उलट अजित पवारांनी आता निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकल्याची बातमी आहे. Ajit pawar defeats sharad pawar in number game, cousin defeats uncle in maharashtra for the first time
आपल्याकडची आमदार संख्या घटलेली पाहून शरद पवारांनी आपण आमदार संख्येची चिंता करत नाही.आमदार निवडून येतात आणि पडतात. आपण तरुण लोकांना संधी देऊन नवीन आमदार निवडून आणू, असे जाहीर आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये केले आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष एक प्रकारे अजित पवारांकडे सरेंडर करून टाकला!!
पण त्यापूर्वी शरद पवार गटाने आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिला. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ करून 83 वर्षाचा योद्धा निघालाय, असे भावनिक आवाहनही केले. पण राष्ट्रवादीच्या “व्यावहारिक” आमदारांना ते फारसे पटलेले दिसले नाही. त्यामुळे शरद पवार गटाची आमदार संख्या 12 ते 16 च्या वर जाऊ शकली नाही. त्या उलट अजित पवारांकडे असलेल्या आमदारांची संख्या 32 ते 36 होती, अशी बातमी वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिली.
याचाच अर्थ महाराष्ट्राच्या ज्ञात राजकीय इतिहासात पहिल्यांदा पुतण्याने काकावर मात केली.
शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून राज ठाकरे, नारायण राणे बाहेर पडले. पण ते फार मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडू शकले नव्हते. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी 8 ते 10 आमदारांपलीकडे शिवसेनेचे आमदार फोडले नव्हते. त्यातलेही बरेचसे आमदार परत शिवसेनेत निघून गेले. राज ठाकरे त्यावेळी काका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमदार संख्येच्या बाबतीत मात करू शकले नव्हते. किंबहुना त्यांना आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कधी मात करता आलेली नाही.
शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडून धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतले, पण त्यावेळी ते आमदार नव्हते. एकनाथ खडसे यांना त्यांनी भाजपमधून फोडले, तेव्हा देखील खडसे आमदार नव्हते.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर म्हणजे 2012 नंतर 2022 पर्यंत 10 वर्षे शिवसेना एकसंध ठेवली. 2014 मध्ये 63 आणि 2019 मध्ये 56 आमदार स्वबळावर निवडून आणून दाखविले.
पण अजित पवारांनी जेव्हा प्रत्यक्ष बंड केले, तेव्हा मात्र पहिल्याच फटक्यात काका शरद पवार यांच्यावर मात करून राष्ट्रवादीचे 32 ते 36 आमदार फोडले आणि आपल्या समवेत ते सध्या हॉटेलवर घेऊन गेले. शरद पवारांकडे मात्र 12 आमदार उरल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. उर्वरित 4 आमदार हे कुंपणावर बसल्याचेही या बातम्यांमध्ये नमूद केले आहे. याचा अर्थ उरलेले 4 आमदार जरी शरद पवारांकडे गेले, तरी शरद पवार गटातल्या आमदारांची संख्या 16 होईल आणि अजित पवारांकडे मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे 32 ते 36 एवढी आमदार संख्या असेल, असे आजचे 5 जुलै 2023 रोजीचे चित्र आहे.
पण याचाच राजकीय अर्थ असा की, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पहिल्या फेरीत पुतण्याने काकावर मात केली आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App