विशेष प्रतिनिधी
पाेर्टब्लेअर : Ashish Shelar अंदमानमधील ऐतिहासिक सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा ठाम निर्णय असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. सावरकरांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून भावी पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.Ashish Shelar
सध्या अंदमान-निकोबारच्या दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी सेल्युलर जेलला भेट देऊन सावरकर यांच्या काळकोठडीमध्ये जाऊन नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारक उभारणीसंदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारची भूमिका मांडली. त्यांनी अंदमान-निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची विशेष भेट घेऊन प्रस्तावाची माहिती दिली.
शेलार यांनी सांगितले की, प्रस्तावित स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे दर्शन घडवणारे भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. या स्मारकातून इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा एकत्रितपणे देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. ज्या भूमीत सावरकरांनी कठोर काळकोठडी भोगली, त्या पवित्र ठिकाणाशी महाराष्ट्रातील जनतेचे भावनिक नाते आहे. सावरकर प्रेमींना हे स्थळ श्रद्धास्थानासारखे वाटते. त्यामुळे येथे त्यांचे भव्य आणि उचित स्मारक उभारण्याची गरज आहे.
या स्मारकासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा सुरू असून, ॲड. आशिष शेलार यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आता स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने स्मारकाचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या स्मारकामुळे स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या वीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांची आठवण सदैव जिवंत राहील, आणि नव्या पिढ्यांना त्याग, स्वाभिमान आणि देशभक्तीची शिकवण मिळेल, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App