राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. प्रात्यक्षिक परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या शाळेमध्येच या परीक्षा देता येणार आहेत. 10th 12th exam offline only Information given by the Chairman of the Board, students will also get extra time for written examination
वृत्तसंस्था
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. प्रात्यक्षिक परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या शाळेमध्येच या परीक्षा देता येणार आहेत.
बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान होतील. कोरोना आणि इतर कोणत्याही कारणामुळे अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत.
दुसरीकडे, इयत्ता १०वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार असून काही कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षेत अडथळा आला तर 5 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत त्या होतील. या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार आहेत.
दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. तर इयत्ता 12वीसाठी 14 लाख 72 हजार 562 अर्ज आल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा उपकेंद्र घेण्याचं निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तेथेच परीक्षा होणार आहेत. ज्या शाळेत 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तिथं जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल. 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढीव वेळ, 70 ते 100 गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिक देण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर 10.30 वाजता सुरू होईल. सकाळच्या सत्रात 10.20 वाजता आणि दुपारच्या सत्रात 2.50 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झिक-झॅक पद्धतीने एका वर्गात 25 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App