सलग दुसऱ्यांदा केंद्रात बहुमताने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी सोडत नाहीत. अनेकदा तर त्यांन नरेंद्र मोदी यांना व्यक्तिगत लक्ष्य केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांसाठी मोदी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या १ कोटी ७० लाख रुपयांच्या आर्थिक पॅकेजचे राहूल गांधी यांनी कौतुक केले आहे. काय म्हणाले आहेत राहुल गांधी…वाचा.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोरगरीबांसाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या १ कोटी ७० लाख रुपयांच्या आर्थिक पॅकेजचे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी कौतुक केले आहे. केंद्र सरकारने योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने त्यावर गांभिर्याने विचार सुरू केला होता. पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. गोरगरीबांना दिलासा कशा पध्दतीने देता येईल यावर विचार करण्यात येत होता. गुरूवारी दुपारी निर्माला सितारामन यांनी गरीबांसाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या पॅकेजची घोेषणा केली तेव्हा या विचारमंथनाचा उलगडा जनतेला झाला. गरीबांना ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. या पॅकेजचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वागत केले आहे.
अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राहुल गांधी यांनी लगेचच ट्विट करून मोदी सरकारचे कौतुक केले. सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेनं टाकण्यात आलेलं पहिलं पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचं भारतावर ऋण आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
The Govt announcement today of a financial assistance package, is the first step in the right direction. India owes a debt to its farmers, daily wage earners, labourers, women & the elderly who are bearing the brunt of the ongoing lockdown.#Corona
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 26, 2020
राहूल गांधी यांनी यापूर्वी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांवर नुकतीच टीकाही केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावरून राहूल गांधी पंतप्रधान मोदींवर बेछुट आरोप करत होते. जनतेचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत असताना गांधी यांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये विनाकारण धास्ती निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून राहूल गांधी यांना चांगलेच फैैलावरही घेण्यात येत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल करत हा गुन्हेगारी कट नाही का? असे राहूल गांधी यांनी विचारले होते. रविवारी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर वैद्यकीय सेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, यावरही राहूल गांधी यांनी टीका केली होती. अडचणीचा सामना करणारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी लयाला जाणार आहे. मध्यम स्वरुपातील उद्योग आर्थिक संकटामुळे बंद पडतील अशी भीती आहे. त्यामुळे नुसत्या टाळ्या आणि थाळ्या वाजून परिस्थिती सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजचे कौतुक केले आहे.
Array