देशात राजकीय हिंदुत्वाला अतिशय चांगले दिवस आले असताना महाराष्ट्रात मात्र त्या हिंदुत्वाला काय दिवस आले आहेत…?? पहा…!! सावरकर – हेडगेवार – बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वासाठी खस्ता खाल्ल्या… त्यांचेच अनुयायी 2 ठाकरे – राऊत – फडणवीस एकमेकांच्या हिंदुत्वालाच शिव्या घालत आहेत…!! महाराष्ट्रासाठी फार मोठे दुर्दैवी चित्र आहे…!! हिंदुत्वाचे खरे विरोधक यासाठीच स्वतःची पाठ थोपटून मनातल्यामनात खदाखदा हसत आहेत. Savarkar, Hedgewar, for the Hindutva of Balasaheb
ज्या काळात हिंदुत्व हा शब्द पाली सारखा अंगावरून भारतीय समाज झटकून टाकत होता, त्या काळात सावरकर – हेडगेवार आणि नंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची ज्योत कायम तेवत आणि उंचावत ठेवली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यातून आणि शिवसेना-भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कष्ट आणि घामातून हिंदुत्वाचा झेंडा बुलंद होत असताना याच सावरकर – हेडगेवार आणि बाळासाहेबांच्या अनुयायांना मात्र अवदसा आठवली आहे. ते एकमेकांना हिंदुत्व याच मुद्द्यावरून पाण्यात पाहात शिव्या घालत आहेत…!!
सावरकरांनी “हिंदुत्व” हा ग्रंथ लिहून बरोबर 99 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा “हिंदुत्व” हा ग्रंथच आजच्या नरेंद्र मोदींच्या हिंदुत्ववादी राजवटीचा आधार आहे. तो मोदी कृतज्ञतापूर्वक नमूदही करतात. पण त्यांचे अनुयायी मात्र हिंदुत्वाच्या नावाने शिवसेनेला जोरदार शिव्या घालतात. “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,” अशी सिंहगर्जना सावरकरांनी केली होती, तर “होय मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे”, अशी गर्जना डॉ. हेडगेवार यांनी करून माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचे लघुरूपच मी पाहतो आहे, असे 1940 च्या संघ शिबिरात म्हटले होते.
पण आज त्याच हिंदुत्वाच्या अनुयायी मात्र एकमेकांना “घंटा बडवणारे हिंदुत्व”, “घंटाधारी हिंदुत्व”, “गदाधारी हिंदुत्व – गधाधारी हिंदुत्व”, आणि आता त्या पुढे जाऊन “भोंगाधारी आणि पुंगाधारी हिंदुत्व” अशा शेलक्या शब्दांनी हिंदुत्वाला शिव्या घातल्या आहेत. हे शिव्या घालण्याचे कारण काय??, तर फक्त हिंदुत्ववादी अनुयायांमधली जीवघेणी सत्तास्पर्धा… बाकी काही नाही…!!
राज ठाकरे – उद्धव ठाकरे – संजय राऊत – देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यापैकी कोणाचेही सावरकर हेडगेवार आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी वैर नाही, पण ते एकमेकांना नावाने शिव्या घालण्या ऐवजी हिंदुत्वाच्या नावाने शिव्या घालतात हे गैर आहे…!! यात एक सूक्ष्म बारकावा आहे. धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणारे नेते एकमेकांना जरूर शिव्या घालतात. पाण्यात पाहतात. पण “बेगडी धर्मनिरपेक्षता”, “खोटी धर्मनिरपेक्षता” वगैरे शब्दांचे आहेर ते एकमेकांना करत नाहीत…!! ते आपापसातला लढा वैयक्तिक पातळीवर लढून “धर्मनिरपेक्षता” जणू काही पवित्र गोष्ट आहे अशा थाटात उच्चारत असतात…!!
हिंदुत्ववादी नेत्यांना मात्र हे जमत नाही. 2 ठाकरे – फडणवीस – राऊत या सर्व नेत्यांच्या हिंदुत्ववादाच्या शेड्स निरनिराळ्या असतील, पण त्या हिंदुत्ववादी आहेत, हे विसरून चालणार नाही. पण तरी हे नेते एकमेकांना शिव्या घालताना हिंदुत्वाला पहिल्या शिव्या घालतात हे सर्वात गैर आहे किंबहुना धोकादायक आहे. कारण आज ठाकरे – राऊत – फडणवीस यांचे वैर आहे. उद्या ते कदाचित एक होतील पण त्यांची हिंदुत्वाला शिव्या घालणारी आजची भाषणे मात्र हे तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते जोराने भोंग्यांवर वाजवून हिंदुत्व कसे वाईट होते आणि वाईट आहे हे सांगत फिरतील… हे या लघुदृष्टीच्या सावरकर हेडगेवार आणि बाळासाहेबांच्या अनुयायांना दिसत नाही…!! आपल्या वैयक्तिक सत्ता स्पर्धेच्या खालच्या पातळीवर आणून ठेवलेल्या भांडणात 2 ठाकरे, 1 राऊत आणि 1 फडणवीस प्रखर हिंदुत्वाची बदनाम करत आहेत, हे या हिंदुत्ववादी देशाचे आणि समाजाचे दुर्दैव आहे…!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App