नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले, तरी भाजपला पूर्ण बहुमत गमवावे लागले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता डळमळीत करून ती उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांची संख्या वाढली. “इंडी” आघाडीतले अनेक नेते तशी स्वप्नं पाहू लागले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन भाजप महायुतीची सत्ता गेली, ती केंद्रातले मोदी सरकार कोसळेल असे “भाकित” माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले, पण प्रत्यक्षात मोदींची सत्ता उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांच्याच सत्तेला सुरुंग लागल्याचे चित्र दिल्ली आणि मुंबई दिसले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दारू घोटाळ्यात जामीन अर्ज मंजूर जरूर केला, पण त्यांच्या राजकीय नाड्या पुरत्या आवळल्या. मुख्यमंत्री म्हणून काम करण्यावर मोठी बंधने घातली. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायची पाळी आली. आपण दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडून देऊ, अशी घोषणा केजरीवालांना करावी लागली.
हे तेच केजरीवाल आहेत, ज्यांनी मोदींची सत्ता जावी म्हणून लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारात जंग जंग पछाडले होते. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या युतीने सातही जागा गमावल्या. पण त्यानंतर देखील भाजपने स्वबळावरचे बहुमत गमावले म्हणून मोदींची सत्ता जाण्याची स्वप्ने ते पाहू लागले. प्रत्यक्षात दारू घोटाळ्यात त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवायची वेळ आली.
JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
ठाकरे यांनी सोडली मुख्यमंत्रीपदाची आशा
एकीकडे दिल्लीत केजरीवालांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला अशी घरघर लागली, त्याचवेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आशा आणि अपेक्षा जाहीरपणे सोडून दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गमावलेले मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळवायची महत्त्वाकांक्षा सोनिया आणि राहुल गांधींकडून पूर्ण करायचा मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करून पाहिला. महाविकास आघाडीतून आपलेच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करून घेण्यासाठी त्यांनी सहकुटुंब थेट “10 जनपथ” गाठले. पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही. शरद पवारांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा मुख्यमंत्री बनायच्या इच्छेला फोडणी दिली नाही.
आता महाविकास आघाडीतूनच आपल्याला कोणी विचारत नाही हे पाहून उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी मध्ये जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री पदाची आशा आणि अपेक्षा सोडून दिली, पण त्यांनी ती महत्त्वाकांक्षा सोडलीच असे मात्र समजायचे कारण नाही. कारण मला सत्तेतून कोणी रिटायर्ड करू शकत नाही. जोपर्यंत लोक माझ्याबरोबर आहेत, तोपर्यंत मी सत्तेतून रिटायर्ड होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा सोडली याची गॅरंटी मिळाली नाही.
पण केजरीवाल काय किंवा ठाकरे काय, हे दोन्ही नेते भाजपने केंद्रात स्वबळावरचे बहुमत गमावल्यानंतर मोदींची सत्ता उद्ध्वस्त करण्याचे किंवा होण्याचे स्वप्न पाहत होते. प्रत्यक्षात त्यांना स्वतःच्याच मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडायची वेळ आली. विशेष म्हणजे या दोघांच्याही मुख्यमंत्रीपदावर मोदींनी अजिबात गंडांतर आणले नाही, तर त्यांच्या स्वतःच्याच कर्तृत्वाने ते गंडांतर आले. एकाला दिल्लीतला स्वतः केलेला दारू घोटाळा नडला, तर दुसऱ्याला भाजपा विरोधातल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी नाकारले. यामध्ये मोदींनी स्वतःहून काहीही न करता दोन मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्यांना परस्पर सुरुंग लागले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App