नाशिक : बारामतीत उद्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणाऱ्या नमो रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेला “मोदी प्रयोग” फसल्यात जमा आहे. कारण तो “मोदी प्रयोग” स्वतःवर करून घ्यायला शिंदे + फडणवीस आणि अजितदादांनी नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. Eknath shinde, fadnavis and ajit pawar denied sharad pawar’s invitation for lunch
बारामतीत उद्या 2 मार्च रोजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नमो रोजगार महामेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बडे नेते हजर राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, बारामतीत होणाऱ्या या शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेवर खासदार शरद पवारांचे नाव नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव या या कार्यक्रम पत्रिकेवर आहे. त्यामुळे अर्थातच प्रथमच घडलेल्या या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे शरद पवार अस्वस्थ झाले. “आपली बारामती” खऱ्या अर्थाने “धोक्यात” आल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी एक “पॉवरफुल” खेळी करत 2015 मध्ये केलेला “मोदी प्रयोग” शिंदे + फडणवीस आणि अजितदादांवर करायचे ठरवले.
2015 मध्ये शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्याच कार्यक्रमात निमंत्रण देऊन आणले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड अडचणीत सापडली होती. राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळा हे विषय ताजे होते. केंद्रात मोदींचे आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फॉर्ममध्ये होते. त्यामुळे राष्ट्रवादीची चहूबाजूने कोंडी झाली होती. त्यावेळी पवारांनी आपले मोदींची असलेले वैयक्तिक संबंध वापरत मोदींनाच बारामतीत निमंत्रित केले होते. मोदी 14 फेब्रुवारी 2015 रोजी गेले होते. मात्र त्याचा दुष्परिणाम भाजपला सोसावा लागला होता. त्यावेळी राष्ट्रवादीची “पडझड” वाचली होती.
पण हाच प्रयोग पवार आता शिंदे + फडणवीस आणि अजितदादांवर करून पाहिला. त्यांनी बारामतीत उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या तिघांनाही गोविंद बागेत मेजवानीसाठी बोलावले. मुख्यमंत्र्यांना त्यांनी तसे पत्र लिहिले. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पवारांचे निमंत्रण नाकारल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. ते आज सकाळीच शरद पवारांशी बोलले आणि त्यातून मुख्यमंत्र्यांनी + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पवारांचे निमंत्रण नाकारल्याची माहिती समजली, असे संजय राऊत म्हणाले.
याचा अर्थच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांचा “बारामती मोदी प्रयोग” आपल्यावर होऊ देणे टाळले. किंबहुना तो प्रयोग आपल्यावर करून घेण्यास त्यांनी थेट नकार दिला.
अजित पवार शरद पवारांपासून फुटल्या नंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे खऱ्या अर्थाने अडचणीत सापडल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा बारामतीत पराभव होणे याचा अर्थ शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाची त्यांच्याच होम ग्राउंड वर “इतिश्री” होणे असा होणार आहे. याची पवारांना खऱ्या अर्थाने राजकीय भीती निर्माण झाली आहे.
आपणच स्थापन केलेला पक्ष अजित पवार बहुमताच्या बळावर घेऊन गेले आणि बारामतीतला बालेकिल्लाही पाडला, या धोक्याची जाणीव झाल्यामुळे पवारांनी शिंदे + फडणवीस आणि अजितदादांवर “मोदी प्रयोग” करून पाहिला, पण तो प्रयोग आपल्यावर करून घेण्यास तिघांनीही नकार देऊन सुरू होण्यापूर्वीच तो प्रयोग फसवून टाकला. यातच पवारांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्यात भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची चुणूक दिसत आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App