दिल्लीतल्या ६ जनपथमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीची रसभरीत वर्णने “तिसरी आघाडी”, “काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी”, “मोदींच्या नेतृत्वाला पॉवरफुल आव्हान”, वगैरे शब्दांनी मराठी माध्यमांनी केली होती खरी. पण ती अखेर तोंडघशी पडली.sharad pawar clarified his political stand in pune press conference instade of in new delhi
६ जनपथमधली बैठक इतकी फ्लॉप झाली की निवासस्थानाबाहेर येऊन त्या घराचे मालक तिथे जमलेल्या पत्रकारांच्या गर्दीला सामोरेही गेले नाहीत. ते फोटोग्राफरांसमोर आले. फोटो काढून घेतले आणि घरात निघून गेले. त्यावेळी एकमेकांचे हात धरून उंचावण्याचे भान देखील कोणाला राहिले नाही.
बैठक फ्लॉप झाल्याचा राजकीय हबका एवढा मोठा होता की त्यानंतर दोन दिवस दिल्लीत राहुनही ६ जनपथचे मालक पत्रकारांपुढे आले नाहीत. ते रणनीतीकारांबरोबर पुन्हा बसले होते…!!
ते काल दिल्लीतून येऊन पुण्यात पत्रकारांना सामोरे गेले. पूर्वीचे एक गीत होते, “भीमथडीचे अश्व घालती अटकेवरती उडी…” पण गेल्या ४ – ५ दिवसांत उलटेच बघायला मिळाले, भीमथडीच्या अश्वाने अटकेवरती उडी घालण्याचे सोडाच… पण उलट “भीमथडीचे अश्व परतले पुन्हा मूठेतीरी”, म्हणायची वेळ आली. कारण ६ जनपथच्या मालकांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीचा खुलासा पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला.
हा खुलासाही मोठा मासलेवाईक आहे. “मी असले उद्योग वर्षानुवर्षे करीत आलोय,” असे सांगून ते मोकळे झाले. यातून त्यांनी बैठकीची खिल्ली तर उडविलीच पण खुद्द त्यांचा मोदी विरोध देखील किती तकलुपी आहे, हे त्यांच्यावर विसंबून राहणाऱ्या विरोधकांनाही दाखवून मोकळे झाले.
एरवी ६ जनपथच्या मालकांविषयी मराठी पत्रकार किती भक्तिभावाने आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीवर भाळून लिहित असतात. पण पुण्याच्या पत्रकार परिषदेतल्या खुलाशाने त्यांचीही पुरती पंचाइत झाली. पुण्या – मुंबईत बसून हे पत्रकार दिल्लीतल्या सत्तेवर मांड ठोकून बसलेल्या मोदींना पर्याय शोधत असतात. कट्ट्यापासून रोखठोकच्या वट्ट्यापर्यंत ६ जनपथच्या मालकांमधले “राष्ट्रीय नेतृत्व” हुडकून – हुडकून बाहेर काढत असतात. चॅनेली चर्चांचा रतीब घालत असतात. ६ जनपथच्या मालकांनी खुलासा करून एका झटक्यात त्या भक्तियुक्त अंतःकरणाच्या पत्रकारांचे मनच मारून टाकले.
आता मालकच जर, “असले उद्योग मी वर्षानुवर्षे करीत आलोय,” असे म्हणून स्वतःचीच खिल्ली उडवायला लागलेत तर या भक्तियुक्त अंतःकरणाच्या पत्रकारांनी मुत्सद्देगिरीचा परिपाठ गिरविण्यासाठी बघायचे कुणाकडे…??!! आणि त्यांनी कोणत्या मुत्सद्दी दीपस्तंभाकडे पाहून मोदींना पर्यायी नेतृत्व शोधायचे…??!! देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन “राष्ट्रीय नेतृत्वाचा” मागोवा घ्यायचा…??!! याचा जराही विचार ६ जनपथच्या मालकांनी केला नाही ना…!! काय म्हणावे त्यांच्या कठोर अंतःकरणास…!!
एवढे रोखठोकमधून ठोक – ठोकून लिहिले, ६ जनपथच्या मालकांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपविले पाहिजे. म्हणजे पाहा कसे यूपीएचे अश्व भीमथडीचे पाणी पिऊन कसे यमुनातट गाठतील आणि दिल्ली पाहता पाहता काबीज करतील…!! किती आशेने आणि अपेक्षेने लिहिले होते… पण ६ जनपथच्या मालकांनी त्या स्वप्नांचा एका झटक्यात चोळामोळा केला. कुणी सांगितले होते, त्या अपयशी यशवंताच्या नादी लागून ती कुठल्याशा राष्ट्रमंचाची बैठक घ्यायला…?? आणि काँग्रेसमधल्या असंतुष्टांना निमंत्रण धाडायला…?? त्या असंतुष्टांनी नुसती हुल दिली आणि ६ जनपथच्या पुढच्या ४ क्रमांकांपुढे पाहूनच ६ जनपथकडे पाठ फिरवली. इकडे हाती येणारे काँग्रेसी असंतुष्ट “मोत्ये गळावी” तसे गळून गेले आणि आधीच गैरमर्जी असलेले १० जनपथ आणखीनच खप्पामर्जी झाले…!!
काढायला गेले तिसरी आघाडी… तिच्यापरी ती निघालीच नाही आणि दुसऱ्या आघाडीतले उरले सुरले स्थानही डळमळीत झाले. भीमथडीचा अश्व मोठ्या आशेने यमुनातटी गेला पण शेवटी तीनच दिवसांमध्ये मूठा किनारी परतला…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App