राष्ट्रवादीची बोलकी बाहुली


इंदिराबाईंबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला जायचा. मात्र, इंदिराबाईंनी त्या अत्यंत सक्षम आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कणखर आहेत हे स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. इंदिराबाईंच्या बाबत जो उल्लेख व्हायचा तो सुप्रियाबाईंबाबत केला तर फारसं वावगं ठरणार नाही. त्यांना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, यांचा मात्र कसलाच अभ्यास नसताना कायम बडबड चालू असते म्हणून यांना फार तर ‘बोलकी बाहुली’ म्हणू या…

शरद पवारांची कन्या असं भारदस्त बिरुद असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाचा पोस्टमार्टम करणारा हा झणझणीत लेख  Scatching article on halo politics of Supriya Sule



संसदेत काश्मीरला दिलेले विशेष अधिकार आणि 370 कलमाच्या अनुषंगानं त्या संदर्भात चर्चा सुरू होती. काश्मीरचे विशेषाधिकार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही होता. काश्मीरचं प्रादेशिक वेगळेपण टिकावं आणि काश्मीरची प्रगती व्हावी यासाठी आम्ही काँग्रेसनं हे विशेषाधिकार दिले आहेत आणि ते तसेच रहावेत अशी काँग्रेसची आग्रही आणि ठाम भूमिका होती. या भूमिकेसाठी काँगे्रस पक्ष अतिशय जिद्दीनं प्रयत्नशील होता. त्यामुळं त्यावर उघडपणे अत्यंत प्रभावी भाषणं सुरू होती. ‘एक देश, एक निशान, एक संविधान’ ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जुनी घोषणा संघाच्या शाखेत गेलेल्या अनेकांनी ऐकली असेल. त्यामुळं या विषयावर भाजपनंही खूप आग्रही भूमिका घेतली होती. 370 रद्द करायचंच आणि काश्मीरचे कोणतेही विशेषाधिकार ठेवायचे नाहीत या मुद्यावर भाजपची मांडणी सुरू होती. अशावेळी स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समर्थनार्थ किंवा विरोधात एखादी भूमिका मांडली जाईल आणि राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला आपली थोडीफार तरी छाप पाडता येईल असं वाटलं होतं.

राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याबाबत स्वतःची कोणतीही आणि कसलीही भूमिका नव्हती. मुळात काश्मीर प्रश्न काय आहे, याचे स्वरूप काय आहे याबाबतही त्यांच्या डोक्यात सगळा गोंधळ होता. काश्मीर प्रश्नाबाबत स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला जर काही ठाम भूमिका घेता येत नसेल तर ते दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोणती भूमिका घ्यावी याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. हा पक्ष 370 रद्द करू म्हणत भाजपबरोबर गेला असता तरी चाललं असतं. 370 राहिलं पाहिजे, त्याशिवाय काश्मीरचा विकास होणार नाही असं म्हटलं असतं तरी चाललं असतं! परंतु राष्ट्रवादीनं ना या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं ना समर्थनार्थ! अशावेळी त्यांच्या खासदारांनी काहीच भूमिका घेतली नाही. सुप्रिया सुळे सभागृहात होत्या. या विषयावर त्यांनी भाषण केलं. त्यांचं हे भाषण ऐकल्यावर लक्षात येईल की, बाईंना काय म्हणायचंय हे त्यांचं त्यांना कळत नव्हतं. त्यांनी भाषणाची सुरूवात अशा वाक्यानं केली, ‘‘या विषयावर आज अपूर्ण चर्चा होणार आहे, अपूर्ण वादविवाद होणार आहे, कारण माझ्या शेजारी बसणारे फारूक अब्दुल्ला आज सदनात नाहीत.’’

आपण काश्मीरच्या प्रश्नावर बोलतोय, फारूक अब्लुल्लांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त, वाढदिवसानिमित्त किंवा त्यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत नाही, इतकंही बाईंना कळलं नाही. ‘धिस इज अनकम्लिट डिबेट, फारूक अब्दुल्ला इथं असल्याशिवाय ही चर्चा होऊ शकत नाही’ असं म्हणणं हा मूर्खपणा होता, राजकीय अव्यवहारीपणा होता. हे कोणत्याही परिपक्वतेचं लक्षण तर नव्हतच पण त्यांच्याकडं कोणतीही भूमिका नव्हती हे दाखवून देणारं होतं. म्हणजे ‘इंदिरा इज इंडिया’ हे जेवढं चुकीचं होतं, ‘मोदी इज इंडिया’ हे जेवढं चुकीचं आहे तेवढंच ‘फारूक अब्दुल्ला म्हणजे काश्मीर’ असं अप्रत्यक्षपणे सांगणंही खुळेपणाचं आहे. भारताचे गृहमंत्री अमितभाई शहा उठले आणि त्यांनी सुप्रियाबाईंना सुनावलं की, ‘‘त्याला बोलायचं होतं तर आज सभागृहात यायचं होतं, आम्ही काही अडवलं नव्हतं किंवा घरकैदी केलं नव्हतं.’’
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते आले नाहीत.’’
अमितभाई म्हणाले, ‘‘त्याचा आमच्याशी काय संबंध? त्यांना आम्ही आजारी पाडलंय का? आणि आम्ही बरे करणार आहोत का?’’
सुप्रिया सुळे सभागृहात काश्मीर प्रश्नावर बोलायला आल्या होत्या, पक्षाची भूमिका मांडायला आल्या होत्या की अब्दुल्लासोबत आपले कसे घरोब्याचे संबंध आहेत हे दाखवायला आल्या होत्या हे गुलदस्त्यात राहिलं. तुम्हाला काश्मीर प्रश्नाबाबत नेमकं काय म्हणायचंय? तुमचं आकलन काय? नेमकी भूमिका काय? हे शेवटपर्यंत लोकांना कळलं नाही. काश्मीर प्रश्नाबाबत राष्ट्रवादीला काय म्हणायचंय हे त्यांच्या मतदानानंतरही गुपितच राहिलं. आपण याबाबत भाजपसोबत गेलो तर डाव्यांची, मुस्लिमांची मतं जातील ही भीती असावी आणि विरोधात गेलो तर जे सवर्ण हिंदू राष्ट्रवादीला पाठिंबा देतात त्यांची मतं जातील ही भीती असावी. म्हणून मग कोणतीही ठाम भूमिका न घेता या ‘राष्ट्रीय’ म्हणवणार्‍या पक्षानं हा असा मध्यम मार्ग स्वीकारला.

सुप्रिया सुळेंच्या बाबांना अशा विषयावर भूमिका घेता येत नाही. त्यांनी ती घ्यावी यासाठी सुप्रियाबाईंनी त्यांना भाग पाडायला हवं होतं. ते न करता त्यांच्या या भाषणानं त्यांनी स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं संसदेत हसं करून घेतलं. असं असताना त्यांना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार कसा दिला गेला ही फार आश्चर्याची गोष्ट आहे.

‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक गिरीश कुबेर यांनी लिहिलं. या पुस्तकात कुबेरांनी अत्यंत सरधोपटपणे छत्रपती संभाजीराजांबाबत मांडणी केलीय. कुबेरांचा इतिहासाचा अभ्यास नसल्यामुळं आणि त्यातही मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास नसल्यानं हा प्रकार घडला असावा. छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंना सत्तेच्या राजकारणात मारून टाकलं, त्यामुळं शिवाजीराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य गेलं, याची शिक्षा संभाजीराजांना शेवटीशेवटी भोगावी लागली अशा प्रकारची अत्यंत उथळ विधानं या पुस्तकात आहेत. याला इतिहासाचा कसला आधार नाही हे डॉ. कमल गोखले, वा. सी बेंद्रे, डॉ. सदाशिव शिवदे यांनी त्यांच्या लेखनातून पुराव्यासह दाखवून दिलं आहे. असं असताना सुप्रिया सुळे यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठासह ट्विट केलं ‘रिडिंग धिस इंटरेस्टिंग बुक…’ म्हणजे पुस्तकाचा आशय, विषय न पाहता मी किती इंग्रजी पुस्तकं वाचतेय, मला कशी वाचनाची आवड आहे हे दाखवून देण्यासाठी आणि स्वतःची एक नसलेली इमेज तयार करण्यासाठी हा उद्योग केला होता का? की गिरीश कुबेरांसारख्या संपादकाच्या गुडबुकमध्ये राहण्याची ही केविलवाणी धडपड होती? तुम्ही असं कव्हर टाकून हे वाचताय असं सांगण्यापेक्षा तुम्ही जे वाचताय त्याचं तुम्हाला आकलन किती होतंय हे महत्त्वाचं असतं.

तुम्ही गिरीश कुबेर यांच्यासमोर मुलाखतीसाठी बसला होता. त्या आधी त्यांचं ‘इंटरेस्टिंग’ पुस्तक वाचत असल्याची पोस्टही तुम्ही टाकली होती. मग का नाही कुबेरांना विचारलंत, ‘‘संभाजीराजांविषयी आक्षेपार्ह लेखन का केलं?’’ समोर बसून तुम्ही त्यांना मुलाखत देता आणि हा प्रश्न विचारत नाही याचा अर्थच हा आहे की, लोकांच्या प्रश्नाशी, अभ्यासाशी, इतिहासाच्या अस्सल साधनांशी तुम्हाला काही देणं-घेणं नाहीये. तुमच्याकडं काही वेगळेपण नाही. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचं नाव तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठीच घेता. त्यांच्या मान आणि अपमानाशी तुम्हाला काहीही देणंघेणं नाही.

सुप्रिया सुळे यांची लोकसभेची ही तिसरी टर्म. बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्या नेतृत्व करतात. या तीन टर्ममध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ किती बदलला? या मतदारसंघासाठी त्यांनी नेमकं काय केलं? याचा हिशोब सुप्रियाबाईंनी केला पाहिजे. शरद पवारांना भेटायला येणार्‍या लोकांबरोबर फोटो काढून घ्यायचे आणि ते ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करायचे यापेक्षा त्यांचं सामाजिक योगदान काही आहे का? एखाद्या वक्त्याकडं सभा जिंकण्याचं कौशल्य असावं लागतं. तेही सुप्रियाबाईंकडं नाही. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या आघाडीमध्ये तुम्ही आजवर काही बदल केलेत का? एखाद्या मतदारसंघात तुम्ही भाषण केलं तर तिथली मत वाढतात का?

राजकारणात इंदिराबाईंबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला जायचा. त्या केवळ पंडित नेहरूंमुळं राजकारणात आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जायचा. इंदिराबाईंनी त्या अत्यंत सक्षम आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कणखर आहेत हे स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. इंदिराबाईंच्या बाबत जो उल्लेख व्हायचा तो सुप्रियाबाईंबाबत केला तर फारसं वावगं ठरणार नाही. त्यांना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, यांचा मात्र कसलाच अभ्यास नसताना कायम बडबड चालू असते म्हणून यांना फार तर ‘बोलकी बाहुली’ म्हणूया.

सत्तेच्या राजकारणात सुप्रियाबाईंचं नेमकं स्थान काय? राष्ट्रवादीची राज्यात सत्ता होती. त्यावेळी त्यांना मंत्रीमंडळात काही स्थान दिलं गेलं नाही. केंद्रातही त्यांना कधी स्थान देता आलं नाही. आत्ता राज्यात पुन्हा पवारांच्या आशीर्वादानं सरकार स्थापन झालंय पण सुप्रिया सुळेंना त्यात स्थान नाही. केंद्राच्या राजकारणात रस असलेल्या नेत्याला काश्मीर प्रश्नाबाबत आकलन असणं आणि त्याबाबत ठाम भूमिका घेणं कळायला हवं होतं. ते झालं नाही. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी झालेलं ओझं आहे, हे सत्य त्यांना सांगायला हवं. हे ओझं पवारांनी इतकी वर्षे सांभाळून घेतलं. पवारांच्या पक्षाचं भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्यात आहे का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. यशवंतराव चव्हाण यांनी एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शरद पवार नावाच्या तरूणाला जसं समोर आणलं तसं पवारांनी काही केल्याचं दिसत नाही. पक्षातला एखादा कार्यक्षम वारस पवार नेमतील याची सुतराम शक्यता नाही. त्यांना सुप्रियाबाईंची किंवा अजित पवारांची निवड करावी लागेल. अजित पवारांची निवड करून निवडणुका जिंकता येणार नाहीत आणि सुप्रियाची निवड करून संघटना चालणार नाही, अशाप्रकारचा पेच या पक्षातील नेत्यांसमोर आहे. पुढच्या पिढीचं नेतृत्व म्हणून रोहित पवारांना पुढं आणलं जातंय. ते सगळ्या विषयावर बोलत असतात. मोदींनंतर आपण सर्वज्ञ आहोत, ‘मन की बात’ आपणही करायलाच हवी असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं या कुटुंबातील कुणाचीही पवारांइतकी राजकीय समज आणि जनतेची अचूक नाडी ओळखण्याची कला अवगत नाही. भविष्यात पवारांचे हे वारसदार काही करू शकतील असं चित्र नाही. अशा परिस्थितीत, अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य सुप्रिया सुळे नाहीत.

लोकसभेची तिसरी टर्म त्यांना मिळाली. तिसर्‍या टर्मला पराभूत होता होता त्या कशाबशा निवडून आल्या. मतदारसंघात त्यांचा कसलाही प्रभाव नाही. संसदेत बोलत असतात म्हणून त्यांना बोलकी बाहुली म्हणूया! पण या बोलण्याला काहीच अर्थ नाही. ते होपलेस असतं. कोणतीही विचारधारा नसलेलं हे निरर्थक बोलणं असतं. फारूक अब्दुल्ला सभागृहात नाहीत, हे सांगताना त्या सभागृहात सगळ्यांकडं बघत होत्या. त्यांना वाटलं असणार इतर खासदार त्यांच्या या बोलण्याचं कौतुक करतील, दाद देतील. हा असला बालिशपणा पहिल्या टर्मला ठीक होता. पवारांची मुलगी संसदेत आलीय, बोलतेय म्हणून कौतुक झालंही. आता दुसर्‍या, तिसर्‍या टर्मलाही असाच प्रकार घडत असेल तर कोण कशाला कौतुक करेल? निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही कोणाला कोणती निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. महाराष्ट्रभर फिरताना तुम्ही तुमचा स्वतःचा काही मतदार घडवलाय, तो एखाद्या मतदारसंघात काही चमत्कार घडवेल अशी परिस्थिती नाही. तुमचं सभा गाजवणारं काही डायनॅमिक वक्तृत्व नाही. ‘मोठ्या बापाची लाडकी लेक’ याच भूमिकेतून कार्यकर्ते तुमच्याकडं बघत असतात. इंदिरा गांधीही बड्या बापाच्या कन्या होत्या पण त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. अशीच मोठ्या बापाची आणखी एक मुलगी आपल्या राजकारणात आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे. मुंडे साहेब होते तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. मुंडे साहेबांनंतर एका टर्ममध्येच त्यांचं राजकारण मतदारांनी संपवलं. त्यामुळं सुप्रियाबाईंना भविष्यात इंदिरा गांधी व्हायचं की पंकजा मुंडे व्हायचं हे ठरवायला हवं. इंदिरा गांधी होणं हे तितकं सोपं नाही. ते तितकं साध नाही. इंदिरा गांधी व्हायला वडीलही जवाहरलाल नेहरू असावे लागतात. ही गोष्ट बाजूला ठेवली तरी इंदिरा गांधी व्हायला अंगात एक मूलभूत चातुर्य असावं लागतं. धैर्य असावं लागतं. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, नेतृत्वाबद्दल एक कमालीचा विश्वास असावा लागतो. जो विश्वास इंदिरा गांधी यांच्यापूर्वी कोणत्या राजकारण्यात दिसला नाही आणि त्यांच्या नंतरही तो कुणात दिसला नाही. त्या सुरूवातीच्या कालखंडात पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सगळ्या सचिवांची एक बैठक बोलावली. त्यांना काही सूचना दिल्या. त्या बैठकीनंतर सचिवांनी इंदिराबाईंना पत्रं लिहिली. त्या पत्राच्या सुरूवातीला त्यांनी लिहिलं, ‘रिस्पेक्टेड मॅडम प्राईम मिनिस्टर!’

ही पत्रं वाचल्यावर त्यांनी त्या सगळ्या सचिवांना खडसावून विचारलं की ‘‘यापूर्वीच्या पंतप्रधानांना अ‍ॅड्रेस करताना तुम्ही काय करत होता?’’

मुख्य सचिवांनी सांगितलं, ‘‘आम्ही त्यांना ‘सर’ म्हणून अ‍ॅड्रेस करत होतो.’’

बाईंनी सगळ्या सचिवांना फर्मावलं, ‘‘मला यापुढे सर म्हणूनच अ‍ॅड्रेस केलं जाईल…’’

अशी ताकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. ही ताकत गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांच्यात कुठं दिसतेय का? पवार साहेबांना भेटायला हा आला आणि मी त्याचं स्वागत केलं, पवार साहेबांना भेटायला तो आला आणि मी त्याचा सत्कार केला, पवार साहेबांचा निरोप घ्यायला तो आला आणि मी त्याला शुभेच्छा दिल्या यापुढं सुप्रियाबाईंचे कोणते फोटो समाजमाध्यमांवर दिसतात का? अधूनमधून सारखे अजित पवारांचे आभार. अजितदादांनी हे केलं, अजितदादांनी ते केलं… आज तर अजित पवार दिल्लीत उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. तिथला त्यांचा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळेंनी लिहिलंय की ‘‘अजितदादांचा हा स्वाभिमान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली. दिल्लीच्या तख्ताला दुसरं असं कोणी स्वाभिमानानं सामोरं गेलं नव्हतं.’’ अरे थू तुमच्या बुद्धिवर! कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य स्वाभिमान आणि कुठं अजित पवार? अनेकजण आजवर पवारांना ‘जाणता राजा’ म्हणत होते आणि आता तुम्ही अजित पवारांची तुलना चक्क महाराजांसोबत करताय?

महाराष्ट्रात राजकारण करत असताना तुम्हाला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं होतं. महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या मुलींना सक्षम करण्यात सुप्रिया सुळेंना मोठा वाटा उचलता आला असता. या मुलींना सार्वजनिक जीवनात उतरवण्याची संधी तुमच्याकडं होती. पवारांची मुलगी सामाजिक जीवनात वावरतेय म्हटल्यावर ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, सामान्य, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गातील कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, कामगारांच्या मुली आत्मविश्वासानं तुमच्यासोबत समाजकारणात, राजकारणात यायला हव्या होत्या. त्यासाठी सुप्रियाबाईंना महाराष्ट्रभर फिरावं लागलं असतं. महाराष्ट्रात स्वतःचे मतदार तयार करावे लागले असते. लोकांशी नाळ जुळवावी लागली असती. यातलं त्या काहीच करत नाहीत.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जात होती. त्या जयंती सोहळ्याला सुरूवातीला तुम्ही जात होता. तुम्हाला लॉन्च करण्यासाठी याचं स्वरूप खूप मोठं केलं गेलं. सावित्रीबाईंच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीचा आवाज बनण्याची संधी तुम्हाला मिळाली होती. मात्र कोणत्याही संधीचं सोनं करण्याची क्षमता तुमच्यात कधीच दिसली नाही. संकटाला संधी मानून काम करणार्‍या इंदिराबाई कुठं आणि संधी मिळालेली असतानाही आपला वाचाळवीरपणा दाखवणार्‍या तुम्ही कुठं?

एका बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञापासून प्रेरणा घेत शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला बचत गटाची चळवळ उभारली. ती चळवळही केवळ तुम्हाला प्रमोट करण्यासाठी होती. राज्य सहकारी बँका, जिल्हा बँका, सहकारी बँकांना महिला बचत गटांना मदत करायला भाग पाडलं गेलं. राज्यभरातल्या या बचत गटांच्या महिलांचं प्रभावी नेतृत्व करणं, त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणं, आकार देणं, त्यांच्यातून निर्माण झालेल्या उद्योजिकांना आणखी मोठ्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना सार्वजनिक क्षेत्रात सन्मानानं आणणं आणि त्यांचा आवाज बनणं हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित होतं. तुमच्यासाठी सगळी पूर्वतयारी करून देऊन, अक्षरशः गालिचे टाकूनही तुम्हाला काहीच करता आलं नाही. एखाद्या सुपरस्टारनं आपला मुलगा सिनेमात यावा म्हणून प्रयत्न करावेत, त्याला ओळीनं एका मागून एक सिनेमे काढून द्यावेत आणि ते सुपरफ्लॉप ठरावेत असंच तुमच्याबाबत घडलं. राजेंद्रकुमार नावाच्या अभिनेत्यानं कुमार गौरव नावाच्या त्याच्या मुलाला असेच सिनेमे काढून दिले आणि ते उताणं पडलं. तीच अवस्था राजकारणात तुमची झाली. एवढं कोण करून देतं? सामान्य मुलीसाठी कोणता बाप एवढं करतो?

इतकं सगळं करून देऊनही या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला लोकहितासाठी किंवा स्वतःसाठी काही उपयोग करून घेता आला नाही. एकतर तुमच्यात लढाऊ वृत्ती नाही किंवा तुम्हाला नटणं, फोटो काढणं, कौटुंबीक सोहळ्यात सहभागी होणं अशीच तुमची प्रतिमा असेल तर तुम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला हवं. त्यामुळं महाराष्ट्राचा तर फायदा होईलच पण तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचाही फायदा होईल. सार्वजनिक जीवनात ज्याला काम कराचंय त्याला संकटांना, प्रश्नांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याऐवजी तुम्ही कायम या संधी झिडकारल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो अपडेट करण्यात जे स्कील दाखवता ते कामात दाखवा. पक्षाच्या उभारणीत, पक्षाचे मतदार वाढवण्यात, जनाधार वाढवण्यात तुमची भूमिका शून्य आहे. तुम्हाला जशा संधी मिळाल्या तशी संधी भोर, मुळशी, वेल्हा, इंदापूरातल्या एखाद्या झोपडीतल्या गरीब मुलीला मिळाली असती तर तिनं एव्हाना देशाच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली असती. ‘आज मैं उपर, आसमाँ निचे, आज मैं आगे, जमाना है पिछे’ हे दाखवून द्यायची संधी आजवर तुम्ही सातत्यानं घालवली आहे.

एक प्रकार आपण आजूबाजूला अनेकदा बघितला असेल. परिस्थितीमुळं एखादी बाई मोलकरीण म्हणून काम करते. त्या बाईचं पोरगं अठरा वर्षाचं होतं आणि एमआयडीसीत कामाला जायला लागतं. कुणाचं पोरगं त्या प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिक्षण घेतं आणि अधिकारी होतं. कोणी नेटानं चहा टपरीपासून कोणताही छोटा-मोठा उद्योग टाकतं आणि त्यात यश मिळवतं. कुणी अगदी गवंड्याच्या हाताखाली काम करतं आणि रोज चार-पाचशे रूपये मिळवतं. यापैकी कुणाच्याही हातात पैसे आले की ते पोरगं आधी आईला सांगतं, ‘‘तू आता दुसर्‍याच्या घरी भांडी घासायची नाहीत. आजवर माझ्यासाठी जे कष्ट घेतले ते खूप झाले. आता मी तुला काही कमी पडू देणार नाही.’’ ते पोरगं घराची जबाबदारी घेतं आणि थकलेली आई अभिमानानं घरी बसते.

शरद पवारांना वयाच्या ऐंशीव्या वर्षीही नीलम चक्रीवादळात तिथल्या लोकांना धीर द्यायला जावं लागतं. या वयातही सभा घेऊन पावसात भिजावं लागतं आणि त्याचं निवडणुकीसाठी मार्केटिंग करावं लागतं. अशावेळी काय करताहेत सुप्रियाबाई? तुम्हाला भविष्यात हा पक्ष चालवायचाय, पक्षाचं नेतृत्व करायचंय, सगळ्या नेत्यांबरोबर काम करायचंय, तर मग तुमची जबाबदारी नाही का की ऐंशी वर्षाच्या आपल्या म्हातार्‍या वडिलांना सांगावं, ‘‘बाबा, तुम्ही आता घरात बसा, बाहेरचं आम्ही बघू, आमच्या सर्व क्षमता पणाला लावून आम्ही पूर्ण प्रयत्न करू!’’

पक्षाची एक नेता म्हणून तर सुप्रियाबाईंची ही जबाबदारी आहेच पण एक मुलगी म्हणूनही ही त्यांची जबाबदारी आहे. या दोन्ही जबाबदार्‍या जर तुम्हाला पार पाडता येत नसतील तर कोण कशाला तुमच्यावर विश्वास ठेवणार? कोण तुमच्या नेतृत्वाचा आदर करणार? आणि कोण तुम्हाला पवार साहेबांची वारस म्हणून मान्यता देणार? ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे कॉपी राईट मिळण्यापर्यंत सुप्रिया सुळेंना पवारांची वारस म्हणून मान्यता मिळेल. यापुढे जाऊन त्यांचं नेतृत्व कोणी स्वीकारेल असं वाटत नाही. अजित पवारांचं नेतृत्व आणि त्यांच्याकडचा वारसा याविषयी आपण स्वतंत्र लेखात चर्चा करणार आहोत पण सुप्रियाबाई पवारांच्या राजकीय वारसदार होऊ शकत नाहीत असंच चित्र आहे. त्यांचा वारसदार होण्याचं कोणतंही चातुर्य, कोणतेही नेतृत्वगुण, किमान असावे लागणारे सद्गुण, कुठल्याही प्रकारची धडाडी आणि कोणत्याही प्रश्नांचं आकलन त्यांना नाही.

मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत अतिशय आग्रही आहे. गेल्या काही वर्षात या समाजात फार मोठी अस्वस्थता दिसतेय. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांना सार्वजनिक जीवनात मदत करणं, गरीब मराठा मुलांला शैक्षणिक सुविधा देणं आणि शेतीनं होरपळून गेलेल्या आणि आत्महत्या करणार्‍या मराठा समाजातल्या लोकांना आधार देणं हे काम त्यांनी करणं गरजेचं होतं. या सगळ्या कालखंडात मराठा समाजाची आरक्षणासाठीची मोठी चळवळ उभी राहिली. त्याचवेळी सुप्रिया सुळे औरंगाबाद दौर्‍यावर होत्या. तिथं त्यांना विचारलं गेलं, ‘‘मराठा आरक्षणाबाबत तुम्हाला काय म्हणायचंय?’’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मराठा आरक्षणापेक्षाही आमच्याकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत…’’

अरे व्वा! ज्या पक्षाचा मुलाधार मराठा समाज आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांची मुलगी असं विधान करते? तिला आपले वडील चालवत असलेला पक्ष कुणाच्या आधारावर चाललेला आहे, ज्या वर्गाचा आपल्याला पाठिंबा आहे तो कसा सांभाळला पाहिजे हे कळत नसेल तर ती पवारांचा राजकीय वारसदार कशी होऊ शकेल? हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

सुप्रिया सुळेंना प्रशासनाचा अनुभव देणं गरजेचं होतं. अगदी बाप-लेक एका मंत्रीमंडळात असते तरी चाललं असतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘नुसती लुडबूड’ राजकारणाचे कित्ते गिरवत अनुभव घेत आहे. दहा वर्ष काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी यांना मंत्री मंडळात घेण्यात आलं नाही ही जी चूक काँग्रेसनं केली तसंच सुप्रियाबाईंच्या बाबत घडलं. राहुल गांधींना मंत्रीमंडळात घेऊन कामकाजाचा अनुभव दिला असता तर त्यांचं नेतृत्व थोडंफार प्रगल्भ आणि परिपक्व झालं असतं. तीच चूक सुप्रियाबाईंच्या बाबत होतेय. राज्य मंत्रीमंडळात किंवा पक्ष संघटनेत एखादं महत्त्वाचं पद देऊन त्यांना तयार करणं गरजेचं होतं. त्यांना जोपर्यंत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्या वडिलांना भेटायला येणार्‍यांसोबतचे फोटो सोशल मीडियात टाकून समाधान मानत राहणार. राजकारणात सक्रिय होऊन पंधरा-सोळा वर्षे उलटली. अजून किती वर्षे बोलकी बाहुली किंवा ‘बाबांची लाडकी लेक’ म्हणूनच सर्वत्र मिरवणार? पहिल्या टर्मपुरतं ते ठीक होतं. राज ठाकरे यांनी अजित पवारांना सांगितलं होतं की, ‘‘काकांच्या जीवावर जगायचं एक वय असतं, त्यापुढे आपल्या जीवावर जगायचं असतं.’’ तेच ‘काकांच्या’ ठिकाणी ‘बाबांच्या’ हा शब्द वापरून सुप्रिया सुळे यांना सांगायला हवं.

सुप्रिया सुळे यांना प्रथम राज्यसभेवर पाठवलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. एवढं कुणाला मिळतं? एवढ्या सुविधा, एवढा सुखकर राजकीय प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात ना शरद पवारांना मिळाला, ना बाळासाहेब ठाकरेंना मिळाला, ना महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्या मोठ्या नेत्यांच्या मुला-मुलींना मिळाला. एवढं तुम्हाला मिळाल्यावर जर तुमच्याकडून सामान्य लोकांनी काही अपेक्षा ठेवल्या असतील तर त्या अपेक्षांना तुम्ही किती खर्‍या उतरलात? त्या अपेक्षा थोड्याफार प्रमाणात तरी खर्‍या ठरवल्यात का? तुम्ही संसदेत बोलत असता हे खरं आहे पण सामान्य माणसाचे काही प्रश्न घेऊन तुम्ही कधी त्यांच्यात मिसळलात का? पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला जाऊन भिडलेत. यावर सुप्रिया सुळे यांनी काही जनआंदोलन उभारलंय का? तुम्ही राज्याचं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पुढं यावं अशी तुमच्या काही ठराविक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तुम्ही झालात तर सर्वसामान्य माणसाला बरं वाटेल परंतु त्या क्षमता तुमच्यात आहेत का? त्यासाठी तुम्ही काही करू शकता का? त्यासाठी तुमच्याकडून काही परिश्रम घेतले जातील असं वाटतंय का? तुमच्यात त्या अनुषंगानं काही वेगळेपण किंवा गुणवैशिष्ट्ये दिसतात का? या कोरोनाच्या काळात राज्य सरकारनं शेतकर्‍यांची वीज ताड ताड ताड तोडली. काय केलंत सुप्रियाबाई तुम्ही? तुमची या शेतकर्‍यांप्रती काही जबाबदारी नव्हती का?

कोणी तुमच्याकडं आलं की ठरलेलं उत्तर द्यायचं, ‘‘मी पवार साहेबांशी चर्चा करते, मी मुख्यमंत्र्यांशी बोलते, अजितदादांना बोलते, अमूकला सांगते…’’

या कोरोना काळात किती चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे तुमच्याच पक्षाच्या निलेश लंके नावाच्या आमदारानं दाखवून दिलं. तुमच्या बारामती लोकसभा मतदार संघात कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी, त्यांच्या बचावासाठी तुम्ही काही भरीव काम केलं का? महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेचे पुणे शहराध्यक्ष वसंततात्या मोरे जेवढी धडाडी दाखवतात, लोकांच्या अडीअडचणीला स्वतः धावून जातात तेवढंही तुम्ही केलं नाही. तुमच्याकडं पन्नास-साठ आमदार, पाच-सहा खासदार आणि महाराष्ट्रभर पसरलेलं कार्यकर्त्यांचं जाळं असूनही तुम्ही काहीच केलं नाही. हिंदीतला कुमार विश्वास नावाचा कवी किंवा सोनू सूद नावाचा अभिनेता लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याची चळवळ निर्माण करत होते. श्रीनिवास नावाच्या युवक काँगे्रसच्या अध्यक्षानं तर थेट विदेशी दुतावासातील अधिकार्‍यांना ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवण्यापासून सगळी मदत केली. अशावेळी तुम्ही कुणाला काही मदत केली का? किंवा किमान तशी मदत तुमच्याकडे तरी कुणी विश्वासानं मागितली का? देशाचं-राज्याचं नेतृत्व करण्याची स्वप्नं पाहणं खूप झालं. ते बस्स करा! किमान राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात स्वतःचं अस्तित्व जरी टिकवून ठेवायचं असेल तर संघर्ष करायला पर्याय नाही. तसा संघर्ष करत रस्त्यावर आलात तरच या पुढच्या काळात तुम्ही तग धरून राहून शकाल. बाबांची लाडकी मुलगी ही ओळख फक्त तुमच्या घरापुरती राहू द्या. तुमच्यापुढे आता दोन मार्ग आहेत. पहिला इंदिरा गांधी यांचा आणि दुसरा पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा. यातल्या कोणत्या मार्गावर जायचं हे तुमचं तुम्ही ठरवा.

दरवेळी तुमच्या प्रचाराला पवार साहेबांना यावं लागतं. दरवेळी अजितदादांना त्यासाठी त्यांची शक्ती खर्च करावी लागते. तुमच्या विजयासाठी दरवेळी मतदारसंघातले सगळे राजकीय विरोधक पवार साहेबांना हाताशी धरावे लागतात आणि त्यांना जवळ करावं लागतं. काय पद्धत काय? दहा वर्षे घालवूनही तुम्हाला स्वतःचा मतदार तयार करता येत नाही? तुमचे स्वतःचे कार्यकर्तेही तुमच्याबरोबर नाहीत? तुमच्याबाबत ब्रेकिंक न्यूज कोणत्या? तर तुम्ही कोणत्या तरी कार्यकर्त्याला फोन करून धमकावलं, ‘मी बघीन तुझ्याकडं, मी दाखवीन तुला’ अशा तुमच्या धमक्यांना माणसं घाबरतात? पवारसाहेबांकडं बघून लोक हे ऐकून घेतात. एकदा पवार साहेबांना बाजूला ठेवून रस्त्यावर या आणि स्वतःची किंमत पडताळून बघा. भाजपची एखादी महिला आघाडीची तालुका अध्यक्ष तरी तुम्हाला घाबरतेय का ते बघा. भाजयुमोची एखादी महाविद्यालयीन मुलगीही तुम्हाला चर्चासत्रात, भाषणात सहज हरवेल. तुमचं ना बोलणं प्रभावी, ना कोणत्या विषयाचा अभ्यास! शिवसेना महिला आघाडीची एखादी बाईही तुमच्यापेक्षा चांगलं बोलते. मग कसल्या गमजा मारता?

ज्याची ‘तडीपार’ म्हणून तुम्ही कायम हेटाळणी करता ते अमित शहाही तुम्हाला सभागृहात तोंडावर आपटतात. त्यांच्यावर इतरवेळी वाटेल ती चर्चा आपण करूच पण ते सभागृहात येताना कायम तयारी करून येतात इतकं तरी उघड्या डोळ्यांनी बघा. संघर्ष कसा करावा हे तुम्हाला आम्ही सांगायचं का? ऐंशीव्या वर्षी पायाला इतक्या गंभीर जखमा झालेल्या असताना, पावसात भिजत महाराष्ट्रभर फिरणारे तुमचे बाबा तरी एकदा नीट अभ्यासा. संघर्ष करायची तुमची भूमिका आणि वृत्ती आहे का इतकंच महत्त्वाचं.

राजकारण म्हणजे एक संधी असते. त्या संधीचं सोनं करायचं की ती मातीमोल ठरवायची हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. एकदा का खुर्ची गेली, अधिकार गेले की शब्दशः कोणीच विचारत नाही. आज बाबराचे वंशज भजीपावचा गाडा चालवून उदरनिर्वाह करतात. त्यामुळं शरद पवारांच्या नावावर पुढची काही वर्षे तुम्ही टिकून राहू शकाल पण ते शाश्वत नसेल. महापुरूषही काळाच्या ओघात कसे नष्ट होतात याबाबत रॉय किणीकर यांनी खूप सुंदर निरिक्षण नोंदवलंय. तेवढ्या दोन ओळी समजून घेण्याएवढ्या आपण समर्थ आहात. त्यामुळं किणीकरांचा दाखला देतो आणि थांबतो.

कोरून शिळेवर जन्ममृत्युची वार्ता

जा ठेवा त्या जागेवर पणती आता

वाचेल कोणीतरी होताना उत्खनन

म्हणतील कोण हा, कशास याचे स्मरण?

Scatching article on halo politics of Supriya Sule

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात