काँग्रेस सुद्धा इतर तरुण नेत्यांना आपल्यात घेऊन आपला बचाव तर करेलच, पण भाजपशी लढण्याची तोंडी भाषा वापरून इथून पुढच्या काळात ते प्रादेशिक पक्ष फोडायलाही कमी करणार नाहीत याची चुणूक राहुल गांधींच्या उपस्थित कन्हैया कुमारने दाखविली आहे.
प्रसिद्ध सिने गीत आहे, “कही पे निगाहे, कही पे निशाना”. आज तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची आणि त्याचे मित्र म्हणवून घेणाऱ्या प्रादेशिक पक्षांची झाली आहे. या दोघांची “निगाहे” भाजपवर आहेत, पण “निशाने” मात्र एकमेकांवर आहेत…!!Congress and regional parties are trying to smash each other in the name of fighting BJP
आता हेच पहा ना… तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपवर रोज तोफा डागत आहेत. मोदी – शहांना रोज राजकीय शिव्या मोजत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र त्या काँग्रेस फोडताना दिसत आहेत…. बरं फक्त त्यांनी ते पश्चिम बंगाल पुरते केले असते तर समजू शकते. कारण त्यांना कोणत्याही स्थितीत मोदी – शहांच्या भाजपला राज्यात धूळ चारायची होती. आपली शक्ती एकवटून त्यांना भाजपच्या विरोधात लढाई करायची होती. ती लढाई त्या जिंकल्या. अगदी मोठ्या फरकाने जिंकल्या. पण या सगळ्यात त्यांनी काँग्रेसला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला भुईसपाट केले.
भाजप सुरुवातीला तिथे अस्तित्वात नव्हताच. तीन आमदारांच्या बळावर भाजप तृणमूल काँग्रेसशी टक्कर घेणे शक्य नव्हते. पण पक्षाने तृणमूळशी टक्कर घेतली. 70 च्या वर आमदार निवडून आणले. या सगळ्यात दोन तगड्या पैलवानांच्या लढाईत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काडीपैलवान नुसते हरले नाहीत, तर पार भुईसपाट झाले…!! दोन्ही पक्षांचे “शून्य” आमदार निवडून आले.
यानंतर ममता बॅनर्जी यांना आणखीन राजकीय चेव चढला. मोदी – शहांच्या भाजपला संपूर्ण देशात पराभूत करण्याचा त्यांनी विडा उचलला. हा विडा उचलताना त्यांनी पहिल्यांदा आसाम मधला काँग्रेस पक्ष फोडला. महिला काँग्रेसच्या अखिल भारतीय माजी अध्यक्ष सुष्मिता देव यांना फोडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची आसाम प्रदेशाची जबाबदारी सोपवली. त्यांनी आपले 500 समर्थक कार्यकर्ते काँग्रेसमधून फोडून तृणमूळ मध्ये घेतले.
लढाईची भाषा भाजप विरोधात करायची आणि काँग्रेस फोडायची ही ममतांची रणनीती नंतर त्रिपुरामध्येही चालली आणि आता त्रिपुरा मार्गे गोव्यात येऊन ठेपली आहे. गोव्यात ममतांनी माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले आहे. ममतांची ही घोडदौड अन्य राज्यांमध्ये सुरू राहण्याची ही चुणूक आहे. कदाचित पुढचा नंबर उत्तर प्रदेश, बिहार पंजाबचा असू शकतो. राजस्थानचाही असू शकतो.
पश्चिम बंगालमध्ये हे जसे ममतांचे आहे, तसे महाराष्ट्रात शरद पवारांचे!! पवारांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णपणे काँग्रेस फोडून राजकीय दृष्ट्या परिपुष्ट केली आहे. त्यांची देखील भाषा जातीयवादी भाजपशी लढण्याची आहे, पण त्यांनी आतापर्यंत शिवसेना आणि काँग्रेस फोडली आहे.
या प्रादेशिक नेत्यांची चलाख ओळखून आता काँग्रेस श्रेष्ठींनी एक नवी चाल खेळून या नेत्यांना वेगळ्या मार्गाने प्रत्युत्तर देण्याचे ठरवलेले दिसते. राहुल गांधींनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या रूपाने दोन तरुण फायरब्रँड नेते काँग्रेसमध्ये घेतले आहेत. कन्हैया कुमारने आपल्या पहिल्याच भाषणात ममता आणि पवार जशी भाषा भाजप विरोधात वापरतात तशीच भाषा वापरून प्रत्यक्षात त्यांच्या सारख्या प्रादेशिक नेत्यांनाच इशारा दिलेला आहे. काँग्रेस मोठे जहाज आहे. भारतातली लोकशाही वाचवण्यासाठी हे जहाज वाचविले पाहिजे. ते वाचविले नाही, तर इतर छोट्या होड्या – नावांचा काही उपयोग होणार नाही, असा स्पष्ट इशारा त्याने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांची नावे न घेता दिला आहे. यातच काँग्रेसच्या आजच्या राजकीय खेळीची खरी “मेख” आहे.
याचा अर्थच असा आहे की, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांची “नजर” किंवा “निगाहे” भाजपवर आहेत पण “निशाने” मात्र एकमेकांवर आहेत…!! आपली ताकद वाढविण्यासाठी भाजप फोडणे हा काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांचा “घास” नाही, पण एकमेकांना फोडून ते आपले स्वतःचे बळ वाढवू शकतात असा त्याचा राजकीय अर्थ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App