Unknown Facts of Hemant Biswa Sarma : आसाम निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले. मागच्या पाच वर्षांत आसामची धुरा सर्वानंद सोनोवाल यांच्या खांद्यावर होती, तेव्हा त्यांना केंद्रातून आसाममध्ये पाठविण्यात आले होते. यावेळी आसामची सूत्रे हेमंत बिस्व सरमा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ईशान्येतील भाजपचे चाणक्य म्हणूनही सरमा यांना ओळखले जाते. उच्च संघटन कौशल्य, राजकीय डावपेच व दांडगा जनसंपर्क या सर्व सरमा यांच्या जमेच्या बाजू आहेत. पीएचडी प्राप्त सरमा यांच्या रूपाने आसामला उच्चशिक्षित मुख्यमंत्री मिळणार आहे. यानिमित्त सरमा यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश… Unknown Facts of Hemant Biswa Sarma Also Known As BJP’s Chanakya in northeast New CM of Assam
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले. मागच्या पाच वर्षांत आसामची धुरा सर्वानंद सोनोवाल यांच्या खांद्यावर होती, तेव्हा त्यांना केंद्रातून आसाममध्ये पाठविण्यात आले होते. यावेळी आसामची सूत्रे हेमंत बिस्व सरमा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ईशान्येतील भाजपचे चाणक्य म्हणूनही सरमा यांना ओळखले जाते. उच्च संघटन कौशल्य, राजकीय डावपेच व दांडगा जनसंपर्क या सर्व सरमा यांच्या जमेच्या बाजू आहेत. पीएचडी प्राप्त सरमा यांच्या रूपाने आसामला उच्चशिक्षित मुख्यमंत्री मिळणार आहे. यानिमित्त सरमा यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश…
हेमंत बिस्वा सरमा यांनी 2015 मध्ये राहुल गांधींवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. ते म्हणाले की, जेव्हा ते राहुल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा कॉंग्रेस नेते माझ्यापेक्षा आपल्या कुत्र्यावर अधिक लक्ष केंद्रित करत होते. सरमा हे एकेकाळी मुख्यमंत्री असताना कॉंग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निकटवर्तीय होते, पण आज त्यांना आसाम भाजपचा सर्वात शक्तिशाली नेता मानले जाते.
यावेळी आसाममधील 126 विधानसभा जागांपैकी 75 जागा भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने जिंकल्या आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग पाचव्यांदा जळुकबारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. बालपणापासूनच त्यांचा राजकारणाकडे ओढा होता. 1980 मध्ये जेव्हा ते सहाव्या इयत्तेत शिकत होते, तेव्हापासून सक्रिय राजकारणात भाग घेऊ लागले होते. त्यांनी ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (एएएसयू) मध्ये प्रवेश घेतला. एएएसयूवर 1981 मध्ये कारवाईस प्रारंभ झाला. या वेळी दैनिकांपर्यंत प्रसिद्धिपत्रके आणि इतर वस्तू पाठविण्याचे काम सरमा यांना मिळाले.
काही वर्षांनंतर त्यांना एएएसयूच्या गुवाहाटी युनिटचे सरचिटणीस बनविण्यात आले. 1990 च्या दशकात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सरमा यांनी गुवाहाटीतील जळुकबारीतून 2001 पासून निवडणुका लढवायला सुरुवात केली. तेथे त्यांनी आसाम गण परिषदेचे नेते भृगु कुमार फुकान यांचा पराभव केला. यानंतर आजतागायत या जागेवर त्यांचा विजयच झालेला आहे.
कॉंग्रेसमध्ये असताना सरमा यांनी मंत्री म्हणून आसामचे शिक्षण, आरोग्य व कुटुंब कल्याण, कृषी, नियोजन व विकास, पीडब्ल्यूडी आणि अर्थ यासारख्या महत्त्वपूर्ण खात्यांचे काम पाहिलेले आहे. तथापि, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी मतभेद झाल्यामुळे सरमा अखेर 2016च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले.
राहुल गांधींसारखा नेता आपल्याला सोडून कुत्र्याला जास्त महत्त्व देत असल्यामुळे नाराज होऊन त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. एकदा सरमा यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली. ते म्हणाले होते की, एकदा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत आसामच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करू इच्छित होतो, त्या वेळी राहुल गांधी आपल्या पाळीव कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालण्यात व्यग्र होते. यामुळेच मी काँग्रेस सोडली, असे ते सांगतात.
हेमंत सरमा यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1969 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कैलास नाथ सरमा आणि आईचे नाव मृणालिनी देवी आहे. सरमा यांचे प्रारंभिक शिक्षण गुवाहाटीतील कामरूप अकॅडमी स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी केली. सरमा यांनी 1996 ते 2001 दरम्यान गुवाहाटी उच्च न्यायालयात वकिलीही केलेली आहे.
2001 मध्ये सरमा यांनी रिकी भुयान यांच्याशी विवाह केला. सरमा आणि त्यांची पत्नी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सन 2017 मध्ये सरमा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले होते.
Unknown Facts of Hemant Biswa Sarma Also Known As BJP’s Chanakya in northeast New CM of Assam
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App