– महाड येथील राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्रदा
विशेष प्रतिनिधी
महाड : चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून तो सामाजिक न्यायासाठी केलेला ऐतिहासिक संघर्ष होता. तथागत गौतम बुद्धांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे दैवत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडूनच मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी येथे केले. महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशी परिषद होणे अत्यंत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाThe Chavdar Tale Satyagraha was a struggle for social justice: Union Minister Kiren Rijiju
राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने विवेक विचार मंच यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. बार्टी, आर्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) यांच्यासह विविध सहयोगी संस्थांच्या सहभागातून पार पडलेल्या या परिषदेच्या मुख्य सत्रात ते बोलत होते. परिषदेची सुरुवात संविधानाच्या सरनाम्याच्या सामूहिक वाचनाने झाली.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाड चवदार तळे नूतनीकरण आणि विकासकामांची माहिती दिली. पुढील वर्षी म्हणजेच २० मार्च २०२७ रोजी महाड सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी जाहीर केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी, “आंबेडकरी जनतेने सगळा समाज आपला मानून सगळ्यांशी संवाद वाढविला पाहिजे आणि मैत्रीचा हात स्वीकारला पाहिजे,” असे आवाहन केले. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी जातीच्या बेड्या तोडून समाज जोडण्याचे काम प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आवाहन करत परिषदेचा समारोप केला.
– ११ संस्था व व्यक्तींना ‘सामाजिक न्याय पुरस्कार’ प्रदान
या प्रसंगी महाराष्ट्रात सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ मान्यवरांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते “राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.
पुरस्कारार्थी : ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती), मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी-चिंचवड), नागेश मोहन कंडारे (धुळे), प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर), नागसेन शामराव पुंडगे (परभणी), डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड), प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर), शाम वसंत माळवंदे (बुलढाणा), स्मिता सुशांत कवडे (मुंबई), विजय अंबुजी जाधव (अंधेरी, मुंबई), महादेव कृष्णाजी गोठणकर (रत्नागिरी).
या परिषदेला कुलगुरू प्रा. राजनिश कामत, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील कांबळे, विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App