विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Assembly महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे.Maharashtra Assembly
जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे अस्तित्व आणि आमदार टिकवण्यासाठी चाचपडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महायुती सरकार आल्यापासून विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाचेच आमदार विविध मुद्द्यांवरून स्वतःच्या सरकारला कोंडीत पकडत असून मुख्य विरोधकांची भूमिका दुय्यम ठरत असल्याचे दिसते. दरम्यान, खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे आपल्या आमदारांवर विशेष लक्ष असणार आहे. एकूणच सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन हे विविध मुद्द्यांनी गाजणार असल्याचे संकेत आहेत.Maharashtra Assembly
निधी कपात आणि फुटीच्या दडपणाखाली विरोधी आमदार
विधानसभेत २० आमदारांसह ठाकरे गट हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असला तरी त्यांच्यावर सातत्याने फुटीची टांगती तलवार आहे. शरद पवार गटातूनही राजकीय स्थित्यंतराची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सरकारने विरोधी आमदारांच्या विकास निधीला कात्री लावल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. सरकारविरोधात अधिक आक्रमक झाल्यास मतदारसंघातील विकासकामे पूर्णपणे ठप्प होण्याची आणि वैयक्तिक कामे अडकण्याची भीती आमदारांना सतावत आहे. त्यामुळे अनेक विरोधी आमदारांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे.
केवळ जाधव, प्रभू आक्रमक
ठाकरे गटाकडून भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्याव्यतिरिक्त एकाही आमदाराला सभागृहात आपला प्रभाव पाडता आलेला नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अनुभवी नेत्यांची आणि माजी मंत्र्यांची फौज असली तरी अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावामुळे त्यांची शक्ती विखुरलेली दिसत आहे. याचाच फायदा हा सत्ताधारी पक्ष घेताना दिसत आहेत.
धरणांत पाणीसाठा आटला, सरकारचे नियोजन कमी
राज्यात गेल्या वर्षभरात उद्भवलेली अतिवृष्टी आणि काही भागांतील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी होरपळला आहे. धरणांमधील पाणीसाठा आटला असूनही सरकारने वेळेवर ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होत आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे उपलब्ध आहेत:
शेतकरी व कर्जमाफी : अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेला शेतकरी, प्रलंबित कर्जमाफी आणि कांदा उत्पादकांचे तीव्र आंदोलन. महागाई व इंधन दरवाढ : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे कोलमडलेले बजेट आणि वाढती महागाई. जनआंदोलने व कायदा-सुव्यवस्था: ‘शक्तिपीठ महामार्गा’विरोधात भडकलेला लोकक्षोभ आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न. राजकीय दडपशाही व यंत्रणांचा गैरवापर : केंद्रीय तपास यंत्रणांच्या (ईडी-सीबीआय) बळावर विरोधी पक्ष फोडल्याचा सत्ताधाऱ्यांवर असलेला गंभीर आरोप.
मुद्द्यांची उपलब्धता, मात्र विरोधकांत नियोजन नाही
विरोधकांची अस्तित्वाची लढाई
भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाची सत्ता आणि पालिकांमधील विजयाची नशा सध्या शिगेला पोहोचली असून ते विरोधकांना पूर्णपणे चिरडून टाकण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे जनतेच्या आवाजाला धार देण्याऐवजी विरोधक केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यात व्यस्त दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App