विशेष प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला. संघाच्या शताब्दी वर्षात होत असलेल्या या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी सह-सरकार्यवाह तथा वर्गाचे पालक अधिकारी अतुल लिमये, सह-सरकार्यवाह रामदत्त आणि जयपूर प्रांत संघचालक आणि वर्गाचे सर्वाधिकारी महेंद्रसिंह मग्गो उपस्थित होते. मान्यवरांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून वर्गाचा शुभारंभ केला. या वर्गात देशभरातून ८८० शिक्षार्थी सहभागी झाले असून, यामध्ये प्रामुख्याने सामाजिक जागरूकता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.A sense of unity is gained through the worker development class; Second Shiksha class begins in Nagpur
सह-सरकार्यवाह अतुल लिमये यावेळी म्हणाले की, “आपला जन्म भारतात झाला, आपण संघाच्या संपर्कात येऊन स्वयंसेवक बनलो आणि संघ शताब्दी वर्षात ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे आपले परमभाग्य आहे. संघाच्या शताब्दी प्रवासात आपल्याला उपहास, उपेक्षा आणि विरोधाचा सामना करावा लागला. तीनवेळा बंदीचा काळही सोसावा लागला. स्वयंसेवकांचा त्याग, संघर्ष आणि वेळप्रसंगी दिलेल्या बलिदानामुळेच हा प्रवास शक्य झाला. सामान्य दिसणाऱ्या स्वयंसेवकांच्या असामान्य कर्तृत्वानेच संघाची ही भव्य वास्तू उभी केली.”
– मूलभूत सूत्रे नाही बदलली
ते पुढे म्हणाले की, “संघाची व्यक्ती निर्माणाची प्रक्रिया ही विकेंद्रित आहे. रोजची शाखा हा व्यक्ती निर्माणाचा मुख्य भाग आहेच, पण त्याचबरोबर संघ शिक्षा वर्गही व्यक्ती निर्माणाचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. १९२७ पासून या वर्गांची सुरुवात झाली आणि काळानुसार या पद्धतीत बदल होत गेले. मात्र, ‘भारत हिंदू राष्ट्र आहे’, ‘परम वैभव प्राप्त करण्यासाठी संपूर्ण समाजाचे संघटन’ आणि ‘समाज संघटनेसाठी व्यक्ती निर्माण’, ही तीन मूलभूत सूत्रे कधीही बदलली नाहीत. नागपूरमध्ये या वर्गाचे आयोजन होत असल्याने याचे महत्त्व अधिक आहे. येथे शरीरासोबतच मनाची सिद्धताही केली जाते.”
“आपल्याला ‘अमृत काळा’चे साक्षीदार होण्याचे सौभाग्य लाभले असून या कालावधीचा पूर्ण उपयोग आपल्याला करायचा आहे. वर्गातील शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासोबतच एक वेगळी अनुभूती मिळते. विविध प्रांतांतील स्वयंसेवक येथे एकत्र राहतात, ज्यामुळे ‘हम सब एक हैं’ ही एकात्मतेची भावना प्रबळ होते. गौतम बुद्धांनी म्हटले होते की, मी मुक्तीचा मार्ग सांगतो, परंतु तेथे पोहोचतात तेच जे त्या मार्गावर निरंतर चालत राहतात. आपल्या ध्येय मार्गावर चालण्यासाठी स्वयंसेवकांना सज्ज करण्याचे काम या वर्गात केले जाते,” असेही अतुलजी यांनी नमूद केले.
हा वर्ग पुढील २५ दिवस चालणार असून ४ जून २०२६ रोजी याचा समारोप होईल. समारोप समारंभाला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App