राहुल गांधींनी ज्या प्रकारे कांशीराम यांच्या राजकीय वारसावर डल्ला मारलाय, ते पाहून उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले का??, असा सवाल तयार झाला तर आश्चर्य वाटायला नको. Congress
कारण राहुल गांधींचे मूळात वक्तव्यच असे होते. राहुल गांधींना आपल्या स्वतःच्या 15 – 20 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधी कांशीराम आठवले नव्हते. त्यांनी कधी भाषणामध्ये कांशीराम या नावाचा उल्लेखही केला नव्हता. कधीकाळी काँग्रेसने बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली असेल, तर किरकोळ उल्लेख सोडला, तर काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने कांशीराम किंवा मायावती यांची नावेही कधी घेतली नव्हती.
पण कांशीराम यांच्या उद्याच्या 15 मार्चच्या जयंतीनिमित्त अचानक काँग्रेसला त्यांच्या नावाने एक कार्यक्रम घ्यावासा वाटला आणि राहुल गांधी थेट लखनऊ मध्ये कांशीराम यांच्यावर भाषण देऊन मोकळे झाले. कांशीराम यांनी दलितांसाठी आणि पीडितांना न्याय देण्यासाठी काम केले. पण काँग्रेसनेच तसे काम केले असते कांशीराम यशस्वी झाले नसते. पंडित जवाहरलाल नेहरू जिवंत असते, तर त्यांनी कांशीराम काँग्रेसमधून मुख्यमंत्री केले असते, असे राहुल गांधी यांनी अक्कलेचे तारे तोडले.
– मायावतींनी केले सावध
त्यावरून मायावतींनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना सावध केले. काँग्रेसने त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कधी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला नाही. त्यांना भारतरत्न दिले नाही. ते काँग्रेसवाले काशीराम यांचा काय सन्मान करणार??, असा रास्त सवाल केला.
– राहुल गांधींना आठवण का काढावीशी वाटली??
पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींसारख्या नेत्याला थेट कांशीराम यांची आठवण करावीशी वाटली. त्यांच्या राजकीय वारशावर डल्ला मारावासा वाटला, यातूनच एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे, काँग्रेसचा उत्तर प्रदेशातला प्रचंड मोठा राजकीय वारसा आता संपुष्टात आलाय!!
– काँग्रेसचा वारसा प्रचंड, पण…
एकेकाळी उत्तर प्रदेशच्या काँग्रेसने मोठ-मोठे दिग्गज राष्ट्रीय पातळीवरचे नेते प्रसवले. याच उत्तर प्रदेशने पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर यांच्यासारखे पंतप्रधान दिले. हे सगळे काँग्रेसचे नेते होते. या खेरीज पंडित गोविंद वल्लभ पंत, डॉ. संपूर्णानंद, चंद्रभान गुप्ता, चौधरी चरण सिंह, नारायण दत्त तिवारी, हेमवती नंदन बहुगुणा, वीर बहादूर सिंह यांच्यासारखे मुख्यमंत्री दिले, पण राहुल गांधींना यापैकी कुणाचीही आठवण झाली नाही म्हणा किंवा त्यांनी काढली नाही म्हणा. त्यांना थेट कांशीराम यांची आठवण काढावीशी वाटली, यातच त्यांच्या काँग्रेसचे दारूण अपयश दिसून आले.
– कामराज यांची आठवण
काहीच वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी आणि काँग्रेसने अचानक कामराज यांच्या राजवटीची आठवण काढली होती. तामिळनाडू मध्ये काँग्रेसचे पुन्हा सत्ता आली, तर आम्ही कामराज यांच्या कल्याणकारी राजवटी सारखी राजवट पुन्हा देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्यावेळी काँग्रेसच्या प्रचाराचा तामिळनाडू आणि देशभर जोरदार बोलबाला सुद्धा झाला होता. काँग्रेसला आणि गांधी परिवाराला जुन्या काँग्रेस नेत्यांची आठवण आली, याविषयी देशभरात कौतुक देखील झाले होते. पण कामराज यांच्या राजवटीची आठवण जरी उज्ज्वल असली, तरी तमिळनाडू काँग्रेसचे संघटन तेवढे मजबूत नसल्याने काँग्रेसला तिथे यश आले नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कामराज यांची आठवण विसरून गेले होते.
– काँग्रेसचा राजकीय वारसा संपुष्टात
राहुल गांधींचे नेमके तसेच उत्तर प्रदेशच्या बाबतीत झाले. त्यांना काशीराम आठवले, पण पंडित नेहरू यांच्यापासून चंद्रशेखर यांच्यापर्यंत आणि पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्यापासून ते वीर बहादुर सिंह यांच्यापर्यंत कुठलाच नेते आठवले नाहीत किंवा त्यांचा राजकीय वारसा आपण वापरू शकतो, असे त्यांना वाटले नाही. या अर्थाने काँग्रेसच्या उत्तर प्रदेश मधला राजकीय वारसा संपुष्टात आलाय. काँग्रेसचे तिथले संघटन देखील मजबूत उरलेले नाही म्हणून राहुल गांधींना कांशीराम यांच्या राजकीय वारसावर डल्ला मारावासा वाटला. त्या पलीकडे राहुल गांधींच्या लखनऊ मधल्या भाषणबाजीला दुसरा कुठलाही अर्थ नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App