विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis दहा वर्षांत अर्थव्यवस्था तीनपट झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ६६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून पुढील ४ ते ५ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा दुर्दम्य विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण, दावोस दौरा, मराठी शाळांचा मुद्दा यावर सविस्तर माहिती देताना विरोधकांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले, सन २०१२-१३ साली १३ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आपल्या राज्याची होती. फक्त १० वर्षात अर्थव्यवस्था ३ पट झाली आहे. ६६० बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. इतर कोणतंही राज्य आपल्या जवळपास नाही. आपण हाफ ट्रिलियन पार करत पुढे गेलो आहोत. पुढील ४-५ वर्षांत दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण ट्रिलियन होऊ मात्र नाहीतर १-२ वर्षे त्याचा इफेक्ट राहातो. राज्यातील गुंतवणूक केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित नसून नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतही मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पाचे काम छत्रपती संभाजीनगरमध्ये युद्धपातळीवर सुरू असून, याच वर्षी जून महिन्यात या प्रकल्पातील पहिली ईव्ही तयार होईल, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.Devendra Fadnavis
परकीय गुंतवणुकीत नंबर वन
विरोधकांनी दावोस दौऱ्यातील करारांवर उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘लोढा समूहाशी झालेला करार हा प्रत्यक्षात १ लाख कोटींचा ‘गुंतवणूक इन डेटा सेंटर’ असा करार आहे. यात अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि एसटीटी यांसारखे जागतिक हायपर स्केलर्स गुंतवणूक करत आहेत. तसेच पंचशील आणि रहेजा समूहासोबतचे करार हे ब्लॅकस्टोन, जीआयसी सिंगापूर आणि वॉरबर्ग पिंक्स यांसारख्या जागतिक कंपन्यांच्या माध्यमातून येत असलेली थेट परकीय गुंतवणूक आहे.’ देशाच्या एकूण एफडीआयपैकी ३९% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत असून राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी सिद्ध केले.
७५ हजार हिंदूंच्या मारेकऱ्याचा पुळका कशासाठी?
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना करणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात सुनावले. टिपू सुलतानचे गुणगान छत्रपती शिवरायांइतकेच केले पाहिजे, याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाची जी मोडतोड करण्यात आली, त्यामध्ये वर्षानुवर्षे आपल्याला हेच शिकवले गेले की टिपू सुलतान महान राजे होते. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेदेखील तेच टिपू सुलतान होते, हे कधीच सांगितले गेले नाही. ते इंग्रजांशी लढले हे खरे, पण ते केवळ स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले.” अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव न घेता त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर
राजकीयदृष्ट्या फडणवीस यांनी विरोधकांना ‘भ्रमित’ आणि ‘संभ्रमित’ म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महायुती सरकारच्या ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनांचा बचाव केला. टिपू सुलतान आणि औरंगजेब यांच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसला उघडे पाडीत हिंदुत्वाच्या विचारधारेला बळकटी दिली, तर उद्योगांच्या संदर्भात दावोस दौऱ्याचे समर्थन करताना आकडेवारीनिशी उत्तर दिले. बेरोजगारीच्या दरावरून त्यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावत प्रशासकीय आकडेवारीचा वापर करून आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे.
इतिहासाला महत्त्व
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दोन महत्त्वाचे अंतर्गत पैलू मांडले आहेत. पहिला म्हणजे, ऐतिहासिक संदर्भांची दुरुस्ती; त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांमधील बदलांचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दिलेले महत्त्व अधोरेखित केले. दुसरा पैलू म्हणजे कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांचा विकास. कुंभमेळ्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता, त्या निमित्ताने होणारे गोदावरी शुद्धीकरण, काँक्रीटचे रस्ते आणि विमानतळ विकास हा दीर्घकालीन आर्थिक गुंतवणुकीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा केवळ खर्च नसून शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App