नाशिक : नाव महाराष्ट्राच्या संस्कृती रक्षणाचे; मोर्चा मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि त्यात काँग्रेसचे नेते सामील!! हा राजकीय प्रकार आज सांगलीत घडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात आली, असा दावा करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत काढलेल्या मोर्चात मोठे शक्ती प्रदर्शन करून घेतले. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह जयंत पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार विशाल पाटील सुद्धा सामील झाले होते. त्यामुळे या मोर्चाची चर्चा महाराष्ट्रभर रंगली.Sharad Pawar NCP morcha in Sangli in the name of saving Maharashtra culture
– मोर्चाचे खरे कारण
प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेस पक्षाला फारसे राजकीय स्थान उरलेले नाही त्यामुळे काही करून राज्यात खळबळ निर्माण करायची या हेतूनेच हा मोर्चा काढला होता. फक्त त्याला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती रक्षणाचे नाव दिले होते. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा बाप काढला. ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्या विषयी अनुदान उद्गार काढले. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळेच नेते चिडले. खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगलीत आजचा मोर्चा काढण्यासाठी बळ मिळाले.
पण याचा अर्थ असा की गोपीचंद पडळकर यांनी खऱ्या अर्थाने जयंत पाटील आणि सांगलीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला. त्यामुळेच सगळे नेते “जागेवर” आले आणि त्यांना मोर्चा काढून आपले राजकीय अस्तित्व दाखवावे लागले. एरवी सांगली कोल्हापूर सातारा आणि काही अंशी सोलापूर या जिल्ह्यांमध्ये भाजप किंवा शिवसेना यांची ताकद नसताना हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांचे पट काढत होते. एकमेकांच्या सहकारी संस्थांमध्ये हस्तक्षेप करायला मिळावा म्हणून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत होते. त्यावेळी “आक्रमक भाषा” म्हणून अशीच शिवीगाळ एकमेकांना करत होते, पण तेव्हा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती “धोक्यात” आली नव्हती. कारण तेव्हा काँग्रेस नावाच्या राजकीय प्रवृत्तीची सांस्कृतिक दादागिरी महाराष्ट्रात सर्वत्र पसरली होती. पण फक्त गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा बाप काढल्याबरोबर महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती “धोक्यात” आली.
त्यावेळी महाराष्ट्राचे संस्कृती “धोक्यात” आली नव्हती
खुद्द शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तृतीय पंथीयासारखे हातवारे केले, त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती किंवा यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार “धोक्यात” आले नव्हते. सक्षणा सलगरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना “वाटाणा” आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “फुटाणा” म्हटले, त्यावेळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती “धोक्यात” आली नव्हती. आमदार रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये अधिकाऱ्याचा बाप काढला आणि त्याच्या आधी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आवाज खाली म्हणून पोलीस अधिकाऱ्याला धमकावले, त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती आणि यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार “धोक्यात” आले नव्हते. पण फक्त गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा बाप काढल्याबरोबर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लगेच “धोक्यात” आली.
– म्हणून काढावा लागला मोर्चा
त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत मोर्चा काढून राजकीय अस्तित्व दाखवावे लागले आणि आपण त्यांच्याबरोबर आहोत, असे दाखविण्यासाठी खासदार विशाल पाटलांना त्या मोर्चात सामील व्हावे लागले. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांना आक्रमक भाषेत भाषण करावे लागले. यापलीकडे सांगलीच्या मोर्चातून फारसे काही साध्य झाले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App