विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : B.J. Medical College अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. यामध्ये २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स हे विमानात होते, तर उर्वरित ३३ जण बी.जे. मेडिकल कॉलेजच्या आवारात जमिनीवर उपस्थित होते. टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनाच प्रत्येकी एक कोटी कोटींची भरपाई देण्याची घोषणा केली आहे मग ते प्रवासी असोत किंवा जमिनीवरचे नागरिक जे विमान पडल्याने मृत्युमुखी पडले.B.J. Medical College
टाटा समूहाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जखमी झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचार, आर्थिक सहाय्य आणि मानसिक आधारही टाटा समूहाकडून दिला जाणार आहे. “आम्ही या कठीण काळात सर्व पीडित कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहोत,” असे टाटांकडून सांगण्यात आले.
अपघातात मृत झालेले बहुसंख्य लोक हे बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि मेघाणी नगर भागातील रहिवासी होते. विमान थेट कॉलेजच्या होस्टेलवर कोसळल्याने अनेक विद्यार्थी वसतीगृहात अडकले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. संपूर्ण परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे ढग पसरले होते, ज्यामुळे वसतिगृहाचे आणि इमारतीचे प्रचंड नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर, टाटा समूहाने बी.जे. मेडिकल कॉलेजच्या होस्टेलची पुन्हा उभारणी करण्यासाठीही मदत जाहीर केली असून, आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
विमानातील प्रवाशांच्या कुटुंबीयांना टाटांकडून मिळणाऱ्या एक कोटी रुपयांच्या भरपाईव्यतिरिक्त, विमा कंपन्यांकडूनही सुमारे दीड कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. एअर इंडिया विम्याचे प्रमुख विमाधारक टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (४०% हिस्सा) असून, त्याशिवाय ICICI लोम्बार्ड, न्यू इंडिया अश्युरन्स आणि इतर PSU विमा कंपन्या सहभागी आहेत. अंतिम भरपाईचा खर्च AIG आंतरराष्ट्रीय पुनर्विमा कंपनीकडून उचलला जाणार आहे.
या अपघातातील एकमेव जिवंत बचावलेले प्रवासी विश्वास रमेश सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितले की, “टेकऑफनंतर अवघ्या ३० सेकंदांतच जोरदार आवाज झाला आणि काही क्षणात विमान कोसळले. काही समजायच्या आतच सर्व काही नष्ट झाले.”
या अपघाताची तपासणी DGCA आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे विशेष पथक करत असून, ब्लॅक बॉक्स आणि इंजिन प्रणालीची सखोल तपासणी सुरू आहे. या दुर्घटनेमागे फक्त तांत्रिक बिघाड आहे की मानवी चूक किंवा घातपात, हे निष्पन्न होणे बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App