विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पुण्यात रविवारी शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमचे विचार वेगवेगळे असले, तरी कुटुंब म्हणून सोबत असतो. घरातील कार्यक्रमाला आम्ही एकत्र येतोच. ते आज बारामतीत माध्यमांशी बोलत होते.Ajit Pawar
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योग व कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, अशी माहिती आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
साखर संकुलात विविध नेत्यांसोबत बैठक सुरु होती. त्यावेळी अजित पवार बंद दाराआड चर्चा करत होते, अशी बातमी कुणीतरी दिली. अरे काय चर्चा? AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल याबाबत चर्चा झाली”, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही सुख-दु:खात एकमेकांसोबत असतोच
दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भविष्यात काय चित्र दिसेल, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला असता, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातील कार्यक्रम असतील, तर त्याठिकाणी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येतोच. विचारधारा वेगवेगळी आहे. परंतु कुटुंब म्हणून बाकीच्या बाबतीत सुख-दु:खात एकमेकांसोबत असतोच, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
मी कशाला घोटाळा करेन
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून, या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. याबाबत आज पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता, मी कशाला घोटाळा करेन. आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते. त्यावेळेस वेळ कमी होता. अनेकांनी अर्ज भरले. निकषाबाहेर असणाऱ्यांनीही अर्ज भरल्याचे आता ते सर्व लक्षात येत आहे. जसे लक्षात येईल, तसे लाभार्थी कमी केले जात आहेत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
पालकंत्रीपदाबाबत काळजी करू नका
रायगड पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत अजित पवारांना विचारले असता, ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आजच रायगड पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री असो किंवा नसो, त्या जिल्ह्यांच्या कामकाजांवर कुठे परिणाम झालाय का? नाही झालाय. त्यामुळे आपण काळजी करू नका. राज्याच्या प्रमुखांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App