नाशिक : INDI alliance समोर भाजप सारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी असताना काँग्रेस सकट कुठलेच पक्ष एकटे लढून कुठल्या राज्यात सत्तेवर येऊ शकणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक पक्षाला आहे म्हणूनच प्रत्येकाला काँग्रेस बरोबर युती किंवा आघाडी करायची आहे, पण जागावाटपात काँग्रेसचे वर्चस्व मान्य करून त्या पक्षाला डोक्यावर बसू द्यायचे नाही, अशा राजकीय कोंडीत INDI आघाडीतले प्रादेशिक पक्ष सापडले आहेत. काँग्रेसशी जमेना, आणि काँग्रेस वाचून गमेना, अशी महाराष्ट्र आणि झारखंड मधल्या प्रादेशिक पक्षांची अवस्था झाली आहे.INDI alliance
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कितीही राणा भीमदेवी थाटाचे बळ आणले, तरी प्रत्यक्षात संघटनात्मक पातळीवर आणि सहानुभूतीच्या लाटेवर ते भाजपशी एकत्र येऊन देखील टक्कर घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रव्यापी असणाऱ्या काँग्रेसची जुळवून घ्यावेच लागत आहे, पण हे जुळवून घेताना काँग्रेस डोईजड होण्याच्या भीतीने ते अस्वस्थ आहेत.
त्यातूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण स्वतःचा बालेकिल्ला वगळून काँग्रेसच्या विदर्भातल्या बालेकिल्ल्यावर “हल्लाबोल” करून पाहिला. नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला वाटाघाटीच्या टेबलवरून दूर सारले, पण म्हणून काँग्रेस शिवसेना समोर बधली, असे मानायचे कारण नाही. कारण काँग्रेसला जेवढी प्रादेशिक पक्षांची गरज आहे, तेवढीच किंबहुना त्याहूनही अधिक काँग्रेसची प्रादेशिक पक्षांना गरज आहे, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातून समोर आली आहे. म्हणूनच ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांनी डबल डिजिट जागांवर लढायचे मान्य करून काँग्रेसला ट्रिपल डिजिट जागा लढू द्यायला मान्यता दिली आहे.
झारखंडमध्ये लालूंच्या पक्षाची कोंडी
झारखंड मध्ये देखील फार वेगळी परिस्थिती नाही. तिथे काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाशी “डील” केली. पण त्या “डील” मधून लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला बाजूला ठेवले. त्यामुळे लालूंच्या पक्षाने आदळापट चालवली आहे. आम्ही 3 – 4 जागांवर समाधान मानणार नाही आम्हाला ताकदीनुसार 12 ते 15 जागा पाहिजेत, असा आग्रह लालूंच्या पक्षाने धरला. पण काँग्रेस आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लालूंच्या पक्षाला धूप घातला नाही. लालूंचा पक्ष झारखंड स्वतंत्रपणे लढला तरी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाला काही फरक पडणार नाही. उलट ते जर सत्तेवर आले तर लालूंच्या पक्षाला ते सत्तेचा वाटाही देण्याची शक्यता नाही.
पण एकूण काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची हीच कोंडी आहे, की त्यांना एकमेकांशिवाय कुठल्या राज्यात सत्तेवर येता येणार नाही, पण त्याचवेळी प्रादेशिक पक्षांना काँग्रेस डोक्यावर येऊन बसण्याची भीती वाटते आहे आणि काँग्रेसला डोक्यावर बसू देणे त्यांना परवडणारे देखील नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App