विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या या प्रयत्नांना महाविकास आघाडीचे नेते प्रतिसादच देत नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता कुठे आघाडीतले नेते त्यांना प्रतिसाद देऊ लागले आहेत, तोच प्रकाश आंबेडकरांनी त्या आघाडीतून वंचित बहुजन आघाडीसाठी जास्तीत जास्त जागा खेचून घेण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरायला सुरवात केली आहे. Prakash Ambedkar’s preparation to pull maximum seats from Mahavikas Aghadi
त्यातलाच एक फंडा म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मुसलमानांना काँग्रेस पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मुसलमान काँग्रेस पासून दूर राहिले, तर महाराष्ट्रातल्या निम्म्या जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त होईल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी काल वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथे मुस्लिम संवाद मेळाव्यात केले. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली. पण त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत खरंच सामील व्हायचे आहे की महाविकास आघाडीतून वंचितसाठी जास्तीत जास्त जागा खेचून घेण्यासाठी आघाडीवर दबाव वाढवायचा आहे याविषयी दाट शंका तयार झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाने वंचितला जवळ केले, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ताकास तूरी लागू दिली नाही. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात वंचितविषयी सकारात्मक सूर होता, तर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचितला रीतसर निमंत्रण धाडण्यात आले. पण त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे.
काय म्हणाले आंबेडकर??
आपल्याला काँग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये. लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली, तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत नाही. येत्या 15 दिवसांत हे जागावाटप केले नाही, तर महाविकास आघाडीची अवस्था केंद्रातल्या “इंडिया” आघाडी सारखी होईल. महाविकास आघाडी विखरून जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात “इंडिया” आघाडी तयार झाली होती, मात्र ती तयार होतानाच ती तुटणार हे निश्चित होते कारण त्या आघाडीचे खरे रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद मोदी हेच होते.
काँग्रेसने दिले निमंत्रण
महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी वंचितचे प्रयत्न आता फळाले आहे. उद्धव ठाकरे गटासोबत त्यांचा सलोखा अगोदरच झाला. आज 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेसने वंचितला या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यापूर्वीच आंबेडकर यांच्या बॉम्बने खळबळ उडाली आहे. आंबेडकर आपल्या वक्तव्यातून काँग्रेसवर दबाव वाढवत आहेत, अशी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App