मुंबई : आमच्यात कोणतीही मॅच फिक्सिंग नाही. हे मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी कधीही फसवणार नाही, असे शिंदे – फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपल्याच कार्यकर्त्यांना सांगावे लागले, ही त्यांनीच आतापर्यंत केलेल्या काका केंद्रित राजकारणाची फलश्रुती ठरली आहे!! Ajit pawar is paying the price of sharad pawar’s distrust politics!!
अजित पवारांनी मुंबईत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिले. शिवाय आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. पण हा वरवर दिलेल्या शब्द आहे असे मानता येण्यासारखी आत्ताची राजकीय परिस्थिती नाही.
कारण शरद पवारांच्या राजकारणावर अविश्वासाचा शिक्का एवढा गडद आहे की, तो खुद्द त्यांनाच काय पण त्यांच्या पुढच्या पिढीलाही पुसता येणार नाही, हे अजितदादांच्या आजच्या वक्तव्यातून सिद्ध झाले.
शरद पवार बोलतील एक आणि करतील दुसरेच, जे बोलतील ते करणार नाहीत आणि जे करणार ते बिलकुलच बोलणार नाहीत, ही त्यांनीच तयार केलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातल खोलवर रुजलेली धारणा आहे. पवारांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की समजून घ्यायचे त्याचे राजकारण संपले, अशी साहेबांची “ख्याती” आहे. आता खुद्द पवारांचे राजकारण तर अस्तंगत होत आहे, पण ही “ख्याती” आता पुतण्याला भोवत आहे. त्यामुळेच अजितदादांना शरद पवारांबरोबर आपण मॅच फिक्सिंग केलेले नाही, हे स्टॅम्प पेपर वर लिहून देतो, असे सांगण्याची वेळ आली आहे. “पवार म्हणजे अविश्वासार्ह राजकारण” हे समीकरण पुसण्याचे फार मोठे आव्हान शरद पवारांपेक्षा अजित पवारांसमोर आहे. त्यासाठी एकदा घेतलेली भूमिका आणि दिलेला शब्द कायम ठेवणे यासाठी अपरिहार्य आहे. शरद पवारांच्याच राजकारणाचा अविश्वासार्हतेचा शिक्का जर अजित पवारांवर बसला, तर तो त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी धोकादायक ठरेलच, पण पवार घराण्याच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीवर तो कायमचा ठपका बसेल ही भीती अजित पवारांना अस्वस्थ करत आहे म्हणून त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची भाषा केली आहे.
“केलय काकाने, पण भरतोय पुतण्या”, असला प्रकार आहे!!
काय म्हणाले अजितदादा??
अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निडणुका तोंडावर आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. भाजपसमोर इंडिया आघाडी तग धरु शकणार नाही. लोक मोदींना मतं देणार की खर्गेंना? तुम्हीच सांगा??, असा नेमका सवाल करून अजितदादांनी आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
*अजितदादा पुढे म्हणाले की, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटते, हे आतून एकच आहेत. परंतु तसे काहीही नाही. आता नवीन भूमिका घेतलेली असून त्यात बदल होणार नाही. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाही. माझ्यासोबत आलेल्यांना मी कधीही फसवणार नाही.*
मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत चांगलं काम करा, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे. लोक मोदींना मत देणार की खर्गेंना, तुम्हीच सांगा??, असा सवाल अजितदादांनी कार्यकर्त्यांना केला.
दरम्यान, अजित पवारांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर त्यांची शरद पवार यांच्याशी साधारण चार वेळेस भेट झालेली आहे. पुण्यात एका उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. त्यानंतर दिवाळीमध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तीन भेटी झाल्या. शिवाय दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये काका-पुतणे एकाच मंचावर उपस्थित होते.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मॅच फिक्सिंग आहे का??, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामुळे अजित पवारांनी आज थेट तसे काही नसून स्टॅम्प पेपर वर लिहून देतो म्हणत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. यातच पुतण्याने आत्तापर्यंत केलेल्या काका केंद्रित राजकारणाची फुलश्रुती झाली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App