सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!; पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??

सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!, पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??, हा सवाल विचारण्याची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच राजकीय पूर्वजांच्या राजकीय कर्तृत्वाने आणली आहे. यापैकी एक तर, सुप्रिया सुळे यांचे पिताश्री आहेत आणि दुसरे सुप्रिया सुळे यांचे “पॉलिटिकल मेंटॉर” आहेत. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण ही या गुरु – शिष्यांची नावे आहेत!!Supriya Sule Says, “Invisible Power” in Delhi Weakens Maharashtra!!; But then why did their political forefathers gallop to Delhi??

दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्राला कमकुवत करते. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करते. महाराष्ट्रावर अन्याय करते. असले “पॉलिटिकल मिथ” किंवा धडधडीत राजकीय (अ)सत्य गेली 60 वर्षे महाराष्ट्र ऐकतोच आहे. त्या अन्याय होण्याच्या भाषेत नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या चार-पाच पिढ्या बदलल्या तरी फरक पडलेला नाही.



म्हणूनच मग प्रश्न पडतो, की दिल्लीतल्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्रावर खरंच एवढा मोठा अन्याय केला असेल, महाराष्ट्राचे खरंच खच्चीकरण केले असेल, तर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन काय केले?? हातावर हात धरून का बसले?? दिल्लीच्या अदृश्य शक्तीपुढे त्यांनी शरणागती का पत्करली??

याची उदाहरणे शोधायला फार लांब जावे लागणार नाही. दिल्लीतल्या कथित अदृश्य शक्तींविषयी सुप्रिया सुळे यांचा हा “आकस” महाराष्ट्रातल्या त्यांच्याच राजकीय पूर्वजांच्या अकर्तृत्वाचा आरसा आहे!!

दिल्लीतली “अदृश्य शक्ती” फार भारी होती, ती फार वजनदार होती, म्हणून दिल्ली महाराष्ट्रावर अन्याय करू शकली, असे अजिबात नाही, तर उलट दिल्लीतल्या “अदृश्य शक्तीवर” महाराष्ट्रातल्या नेत्यांची शक्ती भारी पडू शकली नाही. आपल्या नेत्यांची शक्ती कमकुवत ठरली, क्षमता कमी पडली ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राने संपूर्णपणे विश्वास ठेवून दिल्लीत पाठविलेल्या नेत्यांना दिल्लीतल्या “अदृश्य शक्तीवर” कधी मातच करता आली नाही, ही टोचणारी वस्तूस्थिती आहे. ती सुप्रिया सुळे आपल्या वक्तव्यातून चलाखीने लपवत आहेत.

सुप्रिया सुळे आज गडकरी आणि फडणवीस यांची नावे घेत आहेत, पण मूळात गडकरी आणि फडणवीस यांची दिल्लीतल्या कथित अदृश्य शक्तीला आव्हान देण्याची इच्छा आहे का??, त्यांनी तसे आव्हान द्यावे का??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गडकरी आणि फडणवीस यांची राजकीय संस्कृतीच पूर्ण वेगळी आहे. त्या राजकीय संस्कृतीत दिल्लीतली “अदृश्य शक्ती”, “प्रादेशिक शक्ती” असली भाषाच उपलब्ध नाही. पक्ष संघटना महत्त्वाची, संघाचे वर्चस्व मान्य, असली भाषा तिथे आहे. त्याविषयी मतभेद अथवा टीका टिप्पणी होऊ शकते. पण गडकरी आणि फडणवीस यांच्या राजकीय संस्कृतीत दिल्लीतली कथित “अदृश्य शक्ती” ही भाषाच गैरलागू आहे!! त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या पोकळ सहानुभूतीचा इथे उपयोग नाही.

… आणि मूळात सुप्रिया सुळे उल्लेख करतात, ती आजची “अदृश्य शक्ती” मूळची दिल्लीची आहे का?? की ती देशातल्या अन्य प्रांतामधून बाहेर पडून दिल्लीत जाऊन दिल्लीतल्या मूळ शक्तीवर मात करून सत्तारूढ झालेली शक्ती आहे??, हे नीट शोधण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.

*सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता दिल्लीतली अदृश्य शक्ती म्हणून टीका करतात, ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दिल्लीतली खरी अदृश्य शक्तीच नव्हेत, ते गुजरात मधले नेते आहेत आणि त्यांनी आपल्या राजकीय कर्तृत्वावर दिल्लीतल्या खऱ्या राजकीय “अदृश्य शक्तीवर” मात करून दाखविली आहे. ज्या दिल्लीतल्या “अदृश्य शक्ती” समोर सुप्रिया सुळे यांचे राजकीय पूर्वज झुकले होते, त्यांच्यापुढे सरपटले होते, त्या दिल्लीतल्या खऱ्या राजकीय “अदृश्य शक्तीवर” म्हणजे नेहरू – गांधी परिवाराच्या शक्तीवर मोदी आणि अमित शाह यांनी मात करून दाखविली आहे.

त्या नेहरू – गांधी परिवाराच्या “अदृश्य शक्ती” वर सुप्रिया सुळे यांचे राजकीय पूर्वज यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार मात करू शकले नव्हते, उलट त्या शक्ती समोर चव्हाण आणि पवार या दोन्हीही नेत्यांना शरणागती पत्करली होती, याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासात उपलब्ध आहेत.*

उदाहरणे द्यायची झाली, तर यशवंतराव चव्हाण यांनी 1975 मध्ये आणीबाणीला विरोध केला नव्हता. उलट इंदिरा गांधीच आमच्या नेत्या आहेत, त्याच आमच्या पंतप्रधान आहेत आणि त्याच पंतप्रधानपदी कायम राहतील, हा काँग्रेस संसदीय मंडळाने केलेला ठराव घेऊन यशवंतराव चव्हाण देवकांत बरुआ आणि जगजीवन राम हे इंदिरा गांधींच्या घरी म्हणजे पंतप्रधानांच्या “1 सफदरजंग मार्ग” या निवासस्थानी गेले होते.

त्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या झालेल्या बैठकीत यशवंतरावांनी भाषण करताना इंदिरा गांधी आमच्या नेत्या आहेत आणि त्या यापुढेही नेत्याच राहणार इंदिरा गांधी आमच्या पंतप्रधान आहेत यापुढेही इंदिरा गांधीच पंतप्रधान राहणार, असे म्हटले होते. यशवंतरावांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वापुढे शरणागती पत्करण्याचे यानंतरही अनेक प्रसंग इतिहासात नमूद आहेत.

खुद्द सुप्रिया सुळे यांचे पिताजी शरद पवार पी. व्ही. नरसिंह राव यांना आव्हान द्यायला दिल्लीत गेले होते. पण त्यांच्या समोर पराभूत होऊन मुंबईत परतले होते. शरद पवारांनी नंतर सीताराम केसरी या काँग्रेस अध्यक्षांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, पण केसरींसमोरही त्यांना पराभवच पत्करावा लागला होता.

यशवंतराव चव्हाण काय किंवा शरद पवार काय यांना दिल्लीत स्वतःचे असे प्रभावी राजकारण उभे करताच आले नाही. दिल्लीतल्या लॉबीवर कधीही मात करता आली नाही. त्या उलट दिल्लीतल्या काँग्रेस पक्षामधल्या अदृश्य शक्तीची म्हणजेच नेहरू – गांधी परिवाराशी पूर्णपणे जुळवून घेत, शरणागती पत्करत आपले राजकारण पुढे रेटत राहावे लागले, असे राजकीय इतिहास सांगतो.

त्यामुळे महाराष्ट्रावरच्या अन्यायाचे सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य म्हणजे यशवंतरावांच्या छायेतल्या पत्रकारांनी निर्माण केलेले “पॉलिटिकल मिथ” पिढ्यान् पिढ्या पुढे नेणे, हेच आहे. यापेक्षा त्याला फारसा अर्थ नाही. दिल्लीची “अदृश्य शक्ती” असो किंवा “दृश्य शक्ती” असो, तिच्यावर मात करून दिल्लीतल्या सत्तेवर मांडच ठोकावी लागते. दिल्लीच्या सत्तेचा लगाम कसून आपल्या ताब्यात ठेवावा लागतो. शरणागती पत्करून ती शक्ती बधत नसते. तिचा पराभव करूनच स्वतःचा प्रभाव निर्माण करावा लागतो, तेव्हा दिल्लीत स्वबळाची शक्ती निर्माण होते.

ही स्वबळाची शक्ती मोदी – शाहांनी दिल्लीत घुसून निर्माण केली आहे. ती निर्माण करण्याची क्षमता यशवंतराव चव्हाण किंवा शरध पवारांना दाखविता आली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. मग उगाच दिल्लीतल्या “अदृश्य शक्ती” विरुद्ध हाकाटी पिटण्यात काय मतलब आहे??, हा सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीला आणि त्यांच्या राजकीय पूर्वजांना बोचणारा, पण खरा सवाल आहे!!

Supriya Sule Says, “Invisible Power” in Delhi Weakens Maharashtra!!; But then why did their political forefathers gallop to Delhi??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात