नाशिक : छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला एक मुलाखत काय दिली, अन् महाराष्ट्राच्या चाणक्यगिरीची पुरती ऐशी तैशीच सुरू झाली. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर त्यांचे अनुयायीच राजकीय कुस्ती खेळू लागले. Chagan bhujbal exposed how sharad pawar ditched BJP leaders, but supriya sule refutes charges!!
आत्तापर्यंत पाठीत खंजीर खुपसणे हा शरद पवारांच्या राजकारणाला चिकटलेला होता, पण तो त्यांच्या काँग्रेसमधल्या विरोधकांनी चिकटवला होता. मात्र आता तर त्यांनीच काढलेल्या पक्षातल्या दोन गटांमधले त्यांचेच अनुयायी त्यांच्या विश्वासार्हतेवरून आरोप – प्रत्यारोप करत राजकीय कुस्ती खेळत आहेत.
छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत 2014 पासूनच शरद पवारांनी भाजपचा कसा विश्वासघात केला, याची जंत्रीच सांगितल्यानंतर पवारांच्या चाणक्यगिरीची पुरती ऐशी तैशी झाली. खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत हे शरद पवारांच्या बाजूने मैदानात उतरून त्यांनी छगन भुजबळांची बाजू त्यांच्यावर उलटवली.
पण मूळात छगन भुजबळांनी असे काय सांगितले??, की ज्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुण्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि संजय राऊतांना आपल्या नियमित पत्रकार परिषदेतून भुजबळांवर तोफा डागाव्या लागल्या??
तर छगन भुजबळांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत 2014, 2017, 2019 आणि 2023 या सर्व वर्षांमध्ये शरद पवारांनी भाजपच्या नेत्यांशी कशा चर्चा केल्या??, सरकारमध्ये सामील व्हायला, कोण कोणती खाते घ्यायला शरद पवार कसे उत्सुक होते??, याची सविस्तर माहिती दिली. दर वेळेला शरद पवार भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करायचे आणि आयत्या वेळेला माघार घ्यायचे. शब्द फिरवायचे, हे सगळे भुजबळांनी सविस्तर सांगितले. शरद पवारांनी भाजपच्या नेतृत्वाशी विश्वासघातच केला, हे छगन भुजबळांनी अधोरेखित केले.
मी शरद पवारांना गुरु मानतो त्यामुळे मी “विश्वासघात” हा शब्द कसा वापरू?? मी फक्त “ditch” केले हा शब्द वापरतो, पण त्याचा अर्थ तोच होता, अशा शब्दांत भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब केले.
त्यापुढे जाऊन सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा किस्सा भुजबळ यांनी उलगडून सांगितला. पवारांच्या घरातच त्यांच्या राजीनाम्याचे राजकारण शिजले. नंतर ते परस्पर मागे घ्यायचे प्रयत्न झाले. यात बाकीच्या नेत्यांना अंधारातच ठेवले होते. मलाही काही माहिती नव्हती, पण या सर्व प्रकारात पवारांची विश्वासार्हताच पणाला लागली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आणि या गौप्यस्फोटामुळेच राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा मोठी ठिणगी पडली.
वास्तविक आपले “वैचारिक” भांडण भाजपशी आहे. आपण शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे बिलकुल भांडणार नाही, असे काल सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात जाहीर केले होते. पण त्याला 24 तासही उलटले नाहीत, तोच छगन भुजबळांची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि सुप्रिया सुळे यांना भुजबळांच्या वक्तव्यांना छेद घेण्यासाठी परिषद घ्यावी लागली.
या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी भुजबळांचे सगळे आरोप खोडून काढले. शरद पवारांना खरं म्हणजे राजीनामा द्यायचाच नव्हता, पण तुमच्यासारख्या नेत्यांना वैतागून त्यांनी राजीनामा ऑफर केली, असा प्रत्यारोप सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांवर केला. सगळ्या नेत्यांनी भाजपबरोबर जाण्याचा आग्रह केला त्यामुळे शरद पवार दुखावले होते आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पण स्वतः भुजबळांनीच आम्हाला शरद पवारच अध्यक्ष हवेत हे सांगितले होते. त्यामुळे शरद पवार हुकूमशहा आहेत की छगन भुजबळ??, असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांनी देखील नेहमीच्या पत्रकार परिषदेत ईडी – सीबीआयला घाबरून छगन भुजबळ भाजपच्या वळचणीला गेलेत, त्यांच्यावर काय विश्वास ठेवता??, असा सवाल राऊतांनी केला.
पण या सर्व भांडणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या चाणक्यगिरीची मात्र पुरती ऐशी तैशी झाली. महाराष्ट्राचे सगळे राजकारण आपल्या भोवती फिरवून ते आपणच खेळवतो असा समज माध्यमांकरवी पसरवणाऱ्या चाणक्याच्या अनुयायांमध्येच, त्या चाणक्यांच्या मूळ विश्वासार्हतेविषयी भांडण सुरू झाले.
“शरद पवार आणि सत्य”, “शरद पवार आणि विश्वासार्ह राजकारण” हे शब्द कोणीच बोलत नाही, उलट शरद पवार खोटे कसे बोलले?? त्यांनी भाजपच्या नेत्यांचा विश्वासघात कसा केला??, याविषयी त्यांच्या दोन्ही बाजूंच्या अनुयायांचे भांडण लागले आहे, हे पवारांच्या चाणक्यगिरीचे वैशिष्ट्य आहे.
विष्णुदत्त शर्मा म्हणजेच खरे चाणक्य यांचे अनुयायी चाणक्यांच्या चाणक्यगिरी विषयी असे एकमेकांमध्ये कधी भांडले होते का??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App