विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस मधील हक्काच्या दाव्याबाबत निवडणूक आयोगातील सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत??, हा आकडा निवडणूक आयोगाकडेच मागितला. अजित पवार गट आपल्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्याचा दावा करतो, मात्र ते आमदार नेमके किती आणि कोण??, हे त्यांनी निवडणूक आयोगात सांगावे. निवडणूक आयोगाने त्या गटाला तसे आदेश द्यावेत, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. Sharad Pawar group has asked the Election Commission for the number of MLAs of Ajitdada group
शरद पवार गटाला आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने चार वेळा युक्तिवाद करण्याची संधी दिली आहे. आता यापुढे त्यांना युक्तिवाद करण्याची संधी देऊ नये, अशी मागणी अजित पवार गटाच्या वकिलांनी केली. मात्र निवडणूक आयोगाने ती फेटाळली आणि पुढच्या सुनावणीची तारीख 9 नोव्हेंबर दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधला निवडणूक आयोगातला कायदेशीर झगडा किमान महिनाभर तरी चालू राहणार आहे.
दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला भरपूर काम आहे. मध्य प्रदेश, राजस्थान सह पाच राज्यांच्या निवडणुका आजच जाहीर झाले आहेत. त्या पार पाडण्याची जबाबदारी संबंधित राज्यांच्या निवडणूक आयुक्तांची असली, तरी मुख्य निगराणी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचीच असणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीतल्या वादा संदर्भात सुनावणीची 9 नोव्हेंबरची तारीख दिली.
तत्पूर्वी आजच्या युक्तीवादात अजित पवार गटाने शरद पवारांवर घराणेशाही आणि हुकूमशाही मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याचा आरोप केला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदावर कधीच निवडून आले नाहीत. त्यांची कायम नियुक्तीच होत राहिली आणि ते देखील इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि नियुक्त्याच करत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच पक्ष संघटनेच्या निवडणुका झाल्या नाहीत. हे लोकशाही तत्वाला, पक्षाच्या घटनेला धरून घडले नाही. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी लावलेले नियम शरद पवारांनी नेहमी धुडकावले, असा युक्तिवाद शरद पवार अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगात केला.
अजित पवार गटाने आमदार – खासदार लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क सांगितला आहे. त्यांच्या आमदारांची नेमकी संख्या त्यांनी निवडणूक आयोगात जाहीर करावी, असे आव्हान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद करताना दिले. आता या युक्तिवादाला मान्यता देऊन निवडणूक आयोग अजित पवार गटाचे आमदार जाहीर करणे भाग पाडतो की नाही, हे 9 नोव्हेंबरच्या सुनावणीत कळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App