यंदाचा म्हणजे 2022 चा 1मे महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या युनिक ठरणार आहे. कारण त्यादिवशी 2 ठाकरे आणि 1 फडणवीस महाराष्ट्राच्या “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” नारळ फूटी करणार आहेत…!! बघा ना महाराष्ट्राचे राजकारणाने काय विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण वळण घेतले आहे…!! बाळासाहेबांनी प्रत्यक्ष घडविलेले 2 पठ्ठे आणि बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाच्या मुशीत तयार झालेला तिसरा पठ्ठा एकमेकांविरुद्ध “अघोषित” निवडणुकीचे “जाहीर” नारळ फोडणार आहेत. 2 Thackeray – 1 Fadanavis: Coconut sprouts in Maharashtra for “unannounced” elections !!; But how much water in someone’s coconut
अर्थातच याची सुरुवात राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या दिवशी केली. मग भले शरद पवारांनी त्यांना “अदखलपात्र” ठरवले असले तरी गुढीपाडव्यानंतर रोज पवारांना राज ठाकरे या विषयावर नाव घेऊन किंवा नाव न घेता बोलावेच लागत आहे…!!
अलका टॉकीज चौक बाळासाहेब – उद्धव
सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प होते. परंतु आता पवारच राज ठाकरेंवर बोलून “राजकीय मायलेज” मिळवत आहेत हे पाहून काय व्हायचे ते एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकतो असे सांगत उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीचा, नगरसेवकांच्या बैठकीचा धडाका लावत 30 एप्रिलला पुण्यात “अघोषित” निवडणुकीचा “जाहीर” नारळ फोडण्याचे ठरवूनच टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सभेचे ठिकाणनही मोठे “नामी” निवडले आहे…
हाच तो पुण्यातला लोकमान्य टिळक चौक अर्थात अलका टॉकीज चौक आहे, ज्या चौकात बाळासाहेबांनी 1991 च्या लोकसभा निवडणुकीत, “होय, मला नथुरामचा अभिमान वाटतो,” अशी गर्जना केली होती आणि त्या निवडणुकीत बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव करत भाजपचे अण्णा जोशी लोकसभेत पोचले होते…!!
आता त्याच अलका टॉकीज चौकात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपवर आणि आपले चुलत भाऊ राज ठाकरे यांच्यावर फैरी झाडणार आहेत.
राजसभेची चुणूक
दुसरीकडे संभाजीनगरात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या सभेची सर्वाधिक वातावरण निर्मिती आधीच झाली आहे. आजच राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवणार्या योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करून संभाजीनगरच्या सभेची चुणूक दाखवून दिली आहे.
कोल्हापुरातल्या नारळात ना पाणी ना खोबरे
तीनच दिवसांपूर्वी पवारांनी अशीच राष्ट्रवादीची जाहीर सभा कोल्हापुरात घेऊन “अघोषित” निवडणुकीचा “जाहीर” नारळ फोडला होता. पण त्या नारळाचा ना आवाज झाला… ना त्या नारळातून पाणी आले…!! पवारांची कोल्हापूरची भव्यदिव्य जाहीर सभा फारशा प्रसिद्ध अभावी अशी “वाया” गेली…!!
भाजप कसा मागे राहील??
पण आता 2 ठाकरेंच्या सभांचा प्रचंड गाजावाजा होतो आहे आणि त्यात आता तिसऱ्या सभेची 1 मे महाराष्ट्र दिनी भाजपच्या बूस्टर डोस सभेची भर पडत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बुस्टर डोस सभेचे सर्वाधिक मोठे आकर्षण असणार आहे. फडणवीस मुंबईतल्या सोमय्या ग्राउंड वर महाराष्ट्रातल्या “अघोषित” निवडणुकीचा भाजपच्या प्रचाराचा “जाहीर” नारळ फोडणार आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी हे जर “अघोषित” निवडणुकीचे “जाहीर” नारळ फोडण्यात मागे राहणार नसतील तर भाजपने मागे राहून कसे चालेल…??, असा त्यामागचा विचार आहे.
विजयाचे खोबरे कोणत्या नारळात??
वास्तविक भाजपने आपली राजकीय ताकद संभाजीनगरच्या सभे मागे लावली होती. ती अजूनही लावण्यात येईलच, पण आता भाजपच्या मुंबईतल्या आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांनी तरी सोमय्या ग्राउंड वरच्या सभेवर आपले लक्ष कॉन्सन्ट्रेट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने युनिक ठरणार आहे. आता या “अघोषित” निवडणुकीच्या “जाहीर” नारळ फुटेल…!! पण कोणाच्या नारळात किती पाणी निघते…?? आणि कोणता नारळात विजयाचे किती खोबरे निघते हे पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App