राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील महिला राज आणल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी तसा प्रचार प्रसार सुरू केला आहे.Varsha Gaikwad and Supriya Sule : not bringing Mahila Raj, but establishing dynastic politics
काँग्रेसने दोनच दिवसांपूर्वी मुंबई प्रदेश अध्यक्ष पदात बदल करून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आणि त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी या दोन पक्षांनी पुरोगामी पाऊल उचलून महिला राज आणल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात इतर घराणेशाहीला देण्यात आलेली “पुरोगामी हवा” आहे, असेच खरे चित्र आहे.
मूळात काँग्रेसने भाई जगताप यांच्या ऐवजी वर्षा गायकवाड यांना आणून एकनाथ गायकवाड यांचाच राजकीय वारसा मुंबईत पुढे नेण्याचा मनसुबा आखला आहे. एकनाथ गायकवाड हे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस मधला मुंबईतला मोठा दलित चेहरा ही त्यांची ओळख होती. इतकेच नाही, तर मनोहर जोशींसारख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत एकदा पराभूत करण्याचा राजकीय पराक्रम देखील त्यांच्या नावावर लागला होता. पण तरीदेखील एकनाथ गायकवाड यांची ओळख काँग्रेसने मुंबईपुरतीच मर्यादित ठेवली होती.
एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा वर्षा गायकवाड यांच्याकडे आला. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांनी शालेय शिक्षण मंत्री पद सांभाळले होते आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची नियुक्ती आता काँग्रेसने मुंबई प्रदेश अध्यक्षपदी केली आहे. यात काँग्रेसने महिला राज आणण्यापेक्षा पक्षाची राजकीय सोय अधिक बघितली आहे. भाई जगताप आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय समीकरण हा देखील यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांची नियुक्ती एकनाथ गायकवाड यांचा राजकीय वारस पुढे नेणे यापेक्षा फार वेगळे काँग्रेसने केले, असे मानण्यास वाव नाही.
महिला धोरणातही घराणेशाहीच
जे वर्षा गायकवाड यांच्या बाबतीत तेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राचे महिला धोरण आखले आणि राबविले असे त्यांचे समर्थक नेहमीच सांगत असतात. पण हे महिला धोरण राबविताना आधीच्या काँग्रेस आणि नंतरच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातल्या घराणेशाही मधल्याच महिलांना पुढे आणण्यात आले ही राजकीय वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थितीच सुप्रिया सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्ष पदाच्या नियुक्तीतून पुढे सरकली आहे.
शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमताना त्यांना एकमेव कार्यकारी अध्यक्ष ठेवलेले नाही, तर त्यांच्या राजकीय कारकीर्दीची पुढची बांधबंदिस्ती करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांची देखील कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. हा सरळ सरळ राष्ट्रवादीतल्या वारसा आणि घराणेशाही या राजकारणाचा मामला आहे. यात महिला राज हा मुद्दाच इथे उद्भवत नाही.
बाकीच्या महिलांना कुठेय संधी?
कारण वर्षा गायकवाड असोत अथवा सुप्रिया सुळे असोत या त्यांच्या राजकीय घराण्याच्या वारसदार आहेत. त्या सोडून बाकी कोणा सर्वसामान्य घरातल्या कर्तृत्ववान महिलेला पुढे आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एवढ्या मोठ्या पदांवर काम करण्याची संधी दिली असती तर त्याला खऱ्या अर्थाने महिला राज संबोधता आले असते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडलेले नाही. केवळ आपला घराणेशाही राजकीय वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने केलेली नियुक्ती या पलीकडे या नियुक्त्यांमधून “बिटवीन द लाईन्स” वाचण्यासारखे काही नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App