नाशिक : राहुल गांधी नाशकात आले, पण सावरकरांवर काहीही न बोलताच निघून गेले, विरोधकांना त्यांनी “निराश” केले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, चांदवड आणि नाशिक शहर या तीन ठिकाणी थांबली. त्या प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींनी भाषणे केली. त्या प्रत्येक भाषणांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केली. मालेगावात ते अल्पसंख्याकांवर बोलले. चांदवड मध्ये कांदा उत्पादकांविषयी कळवळा व्यक्त केला. चांदवडच्या सभेत त्यांच्या समवेत शरद पवार बोलले.Rahul Gandhi visited nashik during Bharat jodo yatra, but didn’t utter a single word about Savarkar!!
त्यानंतर राहुल गांधी नाशिक मध्ये आले. शालिमार चौकातील इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हार घालून तिथेच त्यांनी चौक सभा घेतली. या चौक सभेत देखील राहुल गांधींनी जुनेच मुद्दे काढून पंतप्रधान मोदी आणि उद्योगपतींवर टीका केली. पोलीस भरती किंवा बाकीच्या भरतीतल्या विद्यार्थ्यांचे सरकारने कर्ज माफ केले का??, असे विचारले. देशात पिछडे, आदिवासी, दलित, सवर्ण गरीब नेमके किती लोकसंख्येने आहेत??, असा सवाल त्यांनी गर्दीला केला. गर्दीतून वेगवेगळे टक्केवारीची उत्तरे आल्यानंतर राहुल गांधींनी त्याची बेरीज करून देशात पिछडे, दलित, आदिवासी, सवर्ण गरीब 90% आहेत, पण देशाच्या कुठल्याच निर्णयाक स्थानांवर त्यांना स्थान नाही, असा आरोप त्यांनी केला.
देशातल्या श्रीमंत उद्योगपतींमध्ये एकही दलित किंवा आदिवासी नाही. मीडिया हाऊस मध्ये कुठल्याही प्रमुख पदावर दलित किंवा आदिवासी नाही. मीडिया हाऊसचा एकही मालक दलित, आदिवासी, गरीब सवर्ण नाही, अशा एकापाठोपाठ एक फैरी त्यांनी मोदी सरकारवर झाडल्या, पण आपल्या संपूर्ण दौऱ्यात राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एक चकार शब्दही काढला नाही. राहुल गांधींनी सावरकरांची स्तुती करणे अपेक्षित नव्हतेच, पण त्यांनी सावरकरांवर त्यांची नेहमीची टीका देखील केली नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांची आणि राहुल गांधींच्या विरोधकांची “निराशा” झाली.
राहुल गांधींनी सावरकरांना “माफीवीर” म्हणून टीका केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रचंड वादळ उठले होते. त्यावेळी शरद पवारांना हस्तक्षेप करून राहुल गांधींना सावरकर समजावून सांगावे लागले होते. सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी होतेच, पण ते समाजसुधारकही होते, असे शरद पवारांनी राहुल गांधींना राहुल आणि सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरच्या बैठकीत सांगितले होते.
या याखेरीस दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधींची सावरकरांविषयीची भूमिका महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षांना अडचणीची ठरत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या मुद्द्यावर कोंडी करण्याची भाजप आणि मित्र पक्ष संधी सोडत नव्हते. राहुल गांधींनी आपल्या मित्र पक्षांची ही अडचण जाणली आणि सावरकरांच्या जिल्ह्यात म्हणजे नाशिकमध्ये येऊन सावरकरांवर बोलणे टाळले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या दोन पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला.
राहुल गांधींसमवेत चांदवड मध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरे हे दोन मोठे नेते सहभागी होणार, असे आधी सांगण्यात आले होते. त्यापैकी शरद पवार राहुल गांधींच्या सभेत चांदवडला हजर राहिले. तिथे त्यांनी भाषण केले, पण आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधींसमावेत नाशिक जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत सामील झाले नाहीत.
आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चांदवडच्या सभेत बोलले, पण राहुल गांधींनी स्वतःहून सावरकरांचा विषय टाळल्याने संजय राऊत यांनी देखील सुटकेचाच नि:श्वास सोडला. नाशिक जिल्हा सोडताना राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वर गाठले. तिथे त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराला रुद्राभिषेक केला आणि तिथून ते पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्याकडे रवाना झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App