प्रतिभाताई पाटील : ज्या काळात महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात अतिशय नगण्य होते, त्या काळात म्हणजे 1960 च्या दशकात प्रतिभाताई पाटलांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवायला सुरुवात केली. प्रतिभाताईंची राजकीय जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसची. जुन्या काळातल्या त्या कायद्याच्या पदवीधर. ज्या काळात महिला शिक्षण ही दुर्मिळ त्या काळात कायद्याची पदवीधर होणे त्याहूनही दुर्मिळ होते, ते प्रतिभाताईंनी आपल्या प्रतिभेच्या बळावर साध्य केले. Pratibhatai patil International_Women’s_Day_Special
1967 मध्ये त्यांना प्रथम महाराष्ट्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर 1977 पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांच्या मंत्री म्हणून काम केले. 1978 मध्ये शरद पवारांच्या काँग्रेस मधल्या बंडामुळे काँग्रेसची सत्ता गेली, तरी देखील प्रतिभाताई महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानीच राहिल्या. त्या महाराष्ट्र विधानसभेतल्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या. 1982 ते 85 या कालावधीत पुन्हा त्यांना काँग्रेसच्याच मंत्रिमंडळात मंत्री पदाची संधी मिळाली.
आणि त्यानंतर राजीव गांधींनी त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी दिली. त्या राज्यसभेच्या उपाध्यक्षही होत्या. 1991 मध्ये नरसिंह राव यांच्या काळात त्यांना लोकसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
प्रतिभाताई नंतरची काही वर्षे राजकीय अज्ञातवासात गेल्या खऱ्या, पण त्या राजकारणातून बाहेर पडल्या नाहीत. 2004 मध्ये जेव्हा यूपीएची सत्ता आली, तेव्हा प्रतिभाताईंना तत्कालीन सरकारने राजस्थानचे राज्यपाल नेमले. 2004 ते 2007 या कालावधीत त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि त्यानंतर त्यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान मिळाला.
प्रतिभाताईंचा सर्वसामान्यांना फारसा माहिती नसणारा पैलू म्हणजे त्या उत्तम वक्त्या, लेखिका, वकील आणि टेबल टेनिसपटू आहेत. “भारत जागवा”चे सहा खंड आणि स्त्री उत्कर्ष की ओर हे पुस्तक हे त्यांच्या लेखणीतून उतरले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App