नाशिक : Maharashtra नवरात्र संपले, दसरा उजाडला की मराठा साम्राज्याचे शिलेदार मुलुखगिरीसाठी बाहेर पडत. ते महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून शत्रूच्या हद्दीत घुसून पराक्रम गाजवत असत. या मराठा साम्राज्याच्या शिलेदारांनी अशाच सीमोलंघनातून थेट अटकेपार झेंडे फडकवले. अहद् तंजावर तहद पेशावर मराठा साम्राज्य निर्माण केले. महाराष्ट्राचा तो दैदिप्यमान इतिहास दोनच शतकांपूर्वी घडला.Maharashtra
पण आता मात्र दसरा मेळाव्यांचे राजकीय सीमोलंघन महाराष्ट्राच्या सीमेच्या आतच घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात आज वेगवेगळे दसरा मेळावे होत असून त्याचा प्रचंड गाजावाजा मराठी मुलखात चालला आहे. नारायण गडावर मनोज जरांगे यांचा पहिला दसरा मेळावा होत आहे, तर लक्ष्मण हाके हे मुंडेंच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे जरांगेंचा दसरा मेळावा, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा गोपीनाथ गडावरचा दसरा मेळावा, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन शिवसेनांचे मुंबईतले वेगवेगळे दसरा मेळावे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर मधला दसरा मेळावा एवढे सगळे दसरा मेळावे महाराष्ट्राच्या सीमेंतर्गत घडत आहेत.
यापैकी संघाचा अपवाद वगळला, तर बाकी सगळे दसरा मेळावे राजकीय दृष्ट्या जे सीमोलंघन करणार आहेत, ते फक्त महाराष्ट्राच्या सीमेतच घडणार आहे. कारण हे दसरा मेळावे आयोजित करणाऱ्या प्रत्येक नेत्याला फक्त महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने दसरा मेळाव्याचा राजकीय उपयोग करून घेण्याची इच्छा आणि इरादा आहे. संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक संघाच्या राष्ट्रीय धोरणाचे सूतोवाच करतात. एक प्रकारे ते संघासाठी पुढच्या वर्षाचे “व्हिजन स्टेटमेंट” असते आणि ते केवळ प्रांतापुरते मर्यादित नसते, तर ते देशव्यापी असते, अशी आत्तापर्यंतची संघाची प्रथा आणि परंपरा आहे.
पण बाकी सगळ्यांचे दसरा मेळावे जल्लोष आणि दणक्यात साजरे होत असले, तरी त्यांचा संबंध महाराष्ट्राबाहेरच्या समाजकारणाशी अथवा राजकारणाशी जोडलेला नसतो, तर तो फक्त महाराष्ट्राच्या सत्ताकारणाशी जोडलेला असतो. या दसरा मेळाव्यांचा राष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्याही गोष्टीशी फारसा संबंधच येत नाही. तसा संबंध आलाच, तर तो फक्त राजकीय टीकाटिपण्णी किंवा नेतृत्वाची स्तुती यांच्या पुरताच मर्यादित येतो.
त्या पलीकडे जाऊन कुठल्याच दसरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राजकारण आणि समाजकारण कसे साधायचे, राष्ट्रीय राजकारणात मुसंडी कशी मारायची, राष्ट्रीय राजकारण पेलायचे असेल, तर कोणते धोरण आखायचे, अवघ्या महाराष्ट्राच्या मतावर संपूर्ण देशाचे राजकारण खेळवायचे असेल, तर कोणत्या चाली रचायच्या, या मुद्द्यांवर महाराष्ट्रात दसरा मेळावे घेणारे कुठलेच नेते ऊहापोह करताना दिसत नाहीत. कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारत दसरा मेळावे घेणाऱ्या नेत्यांनी त्या क्षमताच कधी दाखविल्या नाहीत. म्हणूनच सगळ्यांच्या दसरा मेळाव्यांचे राजकीय सीमोलंघन महाराष्ट्राच्या कुंपणातच अडकून पडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App