आर्थिक सुधारणांचे बजेट मांडताना किती अवघड असते, याचे प्रत्यंतर आज काँग्रेस नेत्यांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया वाचताना येत आहे. एकेकाळी देशाला सुधारणावादी अर्थमंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे पंतप्रधान असे दोन बडे नेते देणारा काँग्रेस पक्ष आपल्या आर्थिक मनोवृत्तीत मात्र मागासच राहिल्याचे दिसून येत आहे…!!Arjun Singh, today Shashi Tharoor !!; There is no difference in the economic attitude of the Congress
1991 मध्ये आर्थिक सुधारणा राबवणारे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना अतिशय कष्टपूर्वक आर्थिक सुधारणा धोरण राबवावे लागले. त्याला त्यावेळचे विरोधी पक्ष भाजप आणि डाव्या पक्ष यांचा विरोध असण्यापेक्षा काँग्रेस अंतर्गत अर्जुन सिंग यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या गटाचा विरोध अधिक तीव्र होता. 1991 ते 1995 या पाच वर्षांच्या कालावधीत अर्जुन सिंग आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक बड्या नेत्यांनी नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणा धोरणाला काँग्रेसमध्ये राहून प्रचंड विरोध केला होता. किंबहुना नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा त्यांनी शेतकरी विरोधी आणि समाज विरोधी करण्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली होती. देशातील विविध आर्थिक क्षेत्रे खुली करण्याचा अर्जुन सिंग आणि त्यांच्या समर्थकांच्या ठाम विरोध होता. त्यामुळे अर्जुन सिंग आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांनी आर्थिक सुधारणा प्रक्रिया राबवताना विविध प्रशासकीय अडथळे मंत्रिमंडळाच्या पातळीवर आणले होते.
आज अर्जुन सिंग यांच्यासारखीच राजकीय कृती राहुल गांधी आणि शशी थरूर यांच्यासारखे नेते करताना दिसत आहेत. आपल्याच काँग्रेस पक्षाने नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे आर्थिक सुधारणावादी बडे नेते देशाला दिले होते, याचा जणू राहुल गांधी आणि शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांना विसरच पडला आहे…!! काँग्रेसी नेत्यांची आर्थिक संकुचित मनोवृत्ती यातून प्रकट होताना दिसते आहे.
एखाद्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी अर्थसंकल्प मांडणे आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी, खासदारांनी त्याचे समर्थन करणे हे स्वाभाविक आहे. विरोधी पक्षांनी कोणत्याही अर्थसंकल्पावर टीका करणे हेही तितकेच स्वाभाविक आहे. परंतु, त्यापलिकडे जाऊन अर्थसंकल्पाचा अर्थ शोधल्यानंतर त्यातील एक इंगित लक्षात येत असते. हे इंगित त्याकाळी भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते ओळखून असत. त्यामुळे ते डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर संयमी भाषेत टीका करताना दिसत.
आज राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पावर केलेली टीका आपण समजू शकतो. परंतु, जेव्हा शशी थरूर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अत्यंत महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या व्यक्तीने सीतारामन यांच्या आर्थिक प्रक्रिया सुधारणावादी अर्थसंकल्पावर टीका करणे हे मात्र पचनी पडत नाही आणि इथेच त्यांची तुलना अर्जुन सिंग यांच्यासारख्या नेत्याशी करणे उचित ठरते. अर्जुन सिंग हे देखील केंद्रीय पातळीवरचे बडे नेते होते. आर्थिक सुधारणा धोरणांचे महत्त्व त्यांना समजत नव्हते, असे अजिबात नव्हते. परंतु त्या आर्थिक सुधारणा आपल्या विरोधी गटाचे असलेले दोन नेते नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग करत आहेत हे त्यांचे “राजकीय दुखणे” होते आणि त्यामुळेच देशाला त्या वेळी आवश्यक असणार्या आर्थिक सुधारणा अर्जुन सिंग यांच्या पचनी पडत नव्हत्या.
असेच काहीसे शशी थरूर यांच्या बाबतीत आज झालेले दिसत आहे. आर्थिक प्रक्रिया सुधारणांची आवश्यकता शशी थरूर यांना पटत नाही, असे अजिबात नाही. पण त्या आर्थिक प्रक्रिया सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार करीत आहे, हे शशी थरूर यांच्या पचनी पडत नाही. हे यातले खरे “राजकीय इंगित” आहे आणि म्हणूनच त्यावेळी, “अर्जुन सिंग होते, आज शशी थरूर आहेत”, असे म्हणावे लागते…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App