हरियाणात राहणारे सर्व भारतीय; मनोहर लाल यांनी नम्रपणे नाकारला नितीशकुमारांचा बिहारींच्या मदतीसाठीचा निधी


संपूर्ण देशांत स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवरून वादळ उठले आहे. राज्ये एकमेंकांवर दोषारोप करत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारतीयत्वाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी मजुरांच्या खर्चासाठी देऊ केलेला निधी नम्रतापूर्वक नाकारला आहे. बिहारींचे हरियाणाच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषि क्षेत्रात योगदान असल्याचे म्हटले आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संपूर्ण देशांत स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवरून वादळ उठले आहे. राज्ये एकमेंकांवर दोषारोप करत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारतीयत्वाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी मजुरांच्या खर्चासाठी देऊ केलेला निधी नम्रतापूर्वक नाकारला आहे. बिहारींचे हरियाणाच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषि क्षेत्रात योगदान असल्याचे म्हटले आहे.

बिहार सरकारने हरियाणाला एक पत्र पाठविले होते. त्यामध्ये हरियाणात अडकलेल्या बिहारी नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली होती. यासाठीचा खर्चही देण्याची तयारी दर्शविली होती. यावर खट्टर यांनी भारतातील प्रत्येक नेत्याने आदर्श घ्यावे असे एक पत्र लिहिले आहे.

यामध्ये खट्टर म्हणतात, बिहारमधील स्थलांतरीत नागरिकांप्रति आपल्याला वाटत असलेली चिंता प्रशंसनीय आणि योग्य आहे. परंतु, मी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की हरियाणामध्ये राहत असलेला प्रत्येक भारतीय नागरिक हा आमचाच आहे. हरियाणाच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषि क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. हरियाणामध्ये काम करत असलेल्या नागरिकाचा जन्म कोठेही झाला असला तरी तो आमच्यासाठी हरियाणाच्या नागरिकापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही. ते आमचे सृहदच आहेत. त्यांची आम्ही अगदी आमचे समजून काळजी घेत आहोत. ही आमची जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य आहे. हरियाणा सरकार त्यांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत करत असून पुढेही करत राहिल.

आज राष्ट्रीय एकता, अखंडता आणि संविधानाची प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आमच्या राज्यात उद्योग पुन्हा सुरू होत आहेत. अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. येथील कामगारांना जेव्हा वाटेल तेव्हा ते परत येऊ शकतात. आपल्या परिवाराला त्यांनी भेटून परत आल्यावर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे खट्टर यांनी स्पष्ट केले.

आपण बिहारच्या नागरिकांसाठी मदत देऊ केली आहे, आम्ही त्याबाबत कृतज्ञ आहोत. परंतु, हा निधी आम्ही अत्यंत सन्मानाने आपल्याला परत करत आहोत, असेही खट्टर यांनी नमूद केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात