नाशिक : “माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात संघ आणि भाजपचे संस्कार आहेत. मला असे वाटते, की मी जीवनाच्या अखेरपर्यंत भाजपमध्ये राहावे आणि जीवनाचा अंत होईल तेव्हा भाजपचा झेंड्यातूनच माझे शव अंतिम संस्कारासाठी जावे,” असे भावपूर्ण उद्गार काढलेले कल्याण सिंग यांचे व्हिडिओ त्यांच्या निधनानंतर खूप व्हायरल होत आहेत.
पण ते सांगत असलेले संघाचे भाजपची संस्कार त्यांच्यावर कोणी केले…?? ते संघ आणि भाजपकडे कसे आकर्षित झाले…?? या कहाणीची सुरुवात होते, भाऊराव देवरस यांच्यापासून…!! भाऊराव देवरस हे भूतपूर्व सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे कनिष्ठ बंधू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरुवातीच्या प्रचारकांपैकी एक ज्येष्ठ – वरिष्ठ प्रचारक.
उत्तर प्रदेशची म्हणजे त्यावेळच्या संयुक्त प्रांताची संघ प्रचारकाची धुरा खांद्यावर घेणारे नेतृत्व. संघात नेतृत्व हा शब्द प्रचलित नाही. परंतु, भाऊराव देवरस यांचे व्यक्तिमत्वच असे होते की आपोआप त्यांच्याकडे प्रचारक म्हणून संयुक्त प्रांतातल्या संघाचे नेतृत्व आले आणि त्यांनी घडविलेले अनेक कार्यकर्ते आपापल्या राजकीय कर्तृत्वाने सर्वोच्च स्थानी पोहोचले.
त्यांनी घडविलेले यातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे कल्याण सिंग…!! भाऊरावांच्या प्रभावाखाली त्यांच्यासारखे अनेक नेते आले. लालजी टंडन, कलराज मिश्रा, राजनाथ सिंह ही प्रदेश पातळीवरची काही मोठी नावे. त्याआधी भाऊरावांच्या प्रभावात बाळासाहेब देवरस यांच्या नंतरचे संघचालक सरसंघचालक रज्जू भैया हे देखील होते.
भाजपचे राजकीय अस्तित्व उत्तर प्रदेशात तोळामासा होते, तेव्हा देखील कल्याण सिंग तिथले प्रभावी नेते होते. पण लोध जातीचे नेते म्हणून. असे म्हणतात की, भाऊरावांनी त्यांना संपूर्ण राज्याचा दौरा करण्याचा सल्ला दिला. राम मंदिर आंदोलनासाठी 1984 पासून प्रचार आणि संघटन करण्याचे काम कल्याण सिंग यांनी उत्तर प्रदेशात केले. त्यातून 1988 – 89 मध्ये त्यांचे नेतृत्व संपूर्ण प्रदेशात प्रस्थापित झाले.
विश्वनाथ प्रताप सिंग सरकारने जेव्हा मंडल आयोगाची घोषणा केली तेव्हा हिंदू समाजात जाती जातीमध्ये फूट पडण्याची भीती कल्याण सिंग यांनी व्यक्त केली. त्यावेळी देखील भाऊरावांनी त्यांना संपूर्ण उत्तर प्रदेशाचा झपाटून टाकणारा दौरा करण्याची सूचना केली. कल्याण सिंग यांनी ती तंतोतंत अमलात आणली. याच दौऱ्यातून आणि रामजन्मभूमीच्या आंदोलनातून कल्याण सिंग यांच्या नेतृत्वाचा प्रवास रामजन्मभूमीच्या आंदोलनातील एक नायक या रुपात झाला.
1980 च्या दशकात उत्तर प्रदेशात 11 आमदारांची पार्टी असलेला भाजप 150 जागा ओलांडून गेला तो 1990 च्या दशकात. यात कल्याण सिंग, लालजी टंडन, राजनाथ सिंग, कलराज मिश्रा या प्रदेश नेत्यांचे महत्त्वाचे योगदान होते. या सर्वांचे मार्गदर्शक होते, भाऊराव देवरस. 1992 मध्ये जुलै महिन्यात मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी वादग्रस्त बाबरी त्याच्याभोवती प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली होती. डॉ. मुरली मनोहर जोशी यांचे या साठी मार्गदर्शन होते. परंतु सुप्रिम कोर्टाने त्याला पायबंद घातला. काम थांबवावे लागले. परंतु, मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंग यांची त्या काळात कस लागला. सुप्रिम कोर्टाला त्यांनी आदेश पाळण्याचे आश्वासन जरूर दिले. परंतु, त्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाचे कलम घातले उत्तर प्रदेश सरकार रामभक्त कार सेवकांवर गोळी चालवणार नाही. लाठी चालवणार नाही. हे आश्वासन त्यांनी तंतोतंत पाळले. बाबरी मशीद पडली त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा त्याग केला. परंतु, रामभक्तांच्या शरीरावर लाठीचा ओरखडाही उठू दिला नाही. गोळी चालवण्याचा तर प्रश्नच आला नाही. बाबरी मशीद पडल्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी पदत्याग केला. परंतु, बाबरी मशीद पडल्यामुळे देशभर जो लांछनाचा म्हणजे देशाच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे, असा आवाज उठला त्याला मात्र त्यांनी कधीही मान्यता दिली नाही. उलट हा शरमेचा दिवस नसून देश गौरवाचा दिवस आहे, असे रोखठोक उद्गार त्यांनी काढले. त्या मतावर ते ठाम राहिले.
कल्याण सिंग यांच्या अखेरच्या दिवसातल्या भाषणांचे हे सार आहे. त्यांनी व्यक्त केलेले संघाचे आणि भाजपचे संस्कार “हे” आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदत्याग केला असला तरी मूळ तत्त्वाचा त्याग केला नाही. हिंदुत्वासाठी आणि राम मंदिरासाठी दिलेले वचन त्यांनी मोडले नाही. हे ते संघाचे आणि भाजपचे संस्कार आहेत. कल्याण सिंग यांनी अखेरच्या क्षणापर्यंत ते तंतोतंत पाळले…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App